अजय तिवारी
मध्य प्रदेशमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे. काँग्रेस पक्षानेइथे भाजपचा धार्मिक राजकारणाचा अजेंडा हायजॅक केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात धर्माच्या नावावर नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न पडला आहे. अशा या राज्यात निवडणुकीचे रण पेटण्यापुर्वी किती प्रकारच्या राजकीय कुरघोड्या होतात ते पहायचे.
मध्य प्रदेशमध्ये यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधीच राज्यातील राजकारण तापू लागले आहे. या राजकारणात धर्माचाही वापर केला जात आहे. नुकताच मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेश कार्यालयात धार्मिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी काँग्रेसचे मुख्यालय भगव्या रंगाच्या झेंड्यांनी सजवले गेले होते. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र शब्दयुद्ध पेटले. त्यामध्ये भाजपने काँग्रेसला इलेक्टोरल हिंदू म्हटले असून त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने भगवा हा भाजपचा ट्रेडमार्क आहे का, अशी विचारणा केली आहे. मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मुख्यालय भगव्या रंगाच्या झेंड्यांनी सजवून मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मध्य प्रदेशमधील मंदिरांसंबधित पुजारी कक्षाचा धार्मिक संवाद कार्यक्रम तेथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्यभरातील मठ आणि मंदिरांचे पुजारी सहभागी झाले होते. या आणि अशा अनेक मोहिमांमुळे राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांची निवडणूक तयारी अधोरेखीत होत असून कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडण्यापुर्वीच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ पहायला मिळत आहे.
अलिकडेच या राज्यात धर्मसंचाद कार्यक्रमचर्चेचा विषय ठरला. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांचे या धर्मसंवाद कार्यक्रमात गदा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थितांना संबोधित करताना कमलनाथ म्हणाले की, आध्यात्मिक शक्ती ही भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती समाजातील लोकांना एकत्र ठेवण्याचे काम करते आणि यासाठीच त्यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश कॅांग्रेस सरकारने उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉरसाठी पुढाकार घेतला होता. नोव्हेंबर 2022 मध्येच काँग्रेसने मंदिर पुजारी सेलची स्थापना केली होती. या सेलच्या माध्यमातून काँग्रेसला हिंदुत्वाची प्रतिमा चमकवायची आहे असा आरोप भाजपकडून केला जात आहे. काँग्रेसने मंदिर पुजारी सेल स्थापन करून शिवनारायण शर्मा यांना अध्यक्ष केले आहे. या सेलच्या माध्यमातून काँग्रेसला ब्राह्मण समाजाची मते मिळवायची असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या सेलच्या माध्यमातून काँग्रेसला मंदिर आणि पुजार्यांचा मुद्दाही मांडायचा आहे. अलीकडेच रामनवमीच्या मुहूर्तावर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आणि छिंदवाड्याचे खासदार नकुलनाथ यांच्या गळ्यात भगवे उपरणे दिसले. या दिवशी छिंदवाडाच्या रघुवंशी समाजातर्फे काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत ते सहभागी झाले होते. यावेळी नकुलनाथ यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले आणि भगवान श्रीरामांची प्रार्थना केली.
गेल्या वर्षी (एप्रिल 2022 मध्ये) देखील, प्रदेश काँग्रेसने आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांना रामनवमी आणि हनुमान चालिसाच्या दिवशी रामलीला, सुंदरकांड, हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्व प्रयत्नांमधून निवडणुकीपुर्वी जनमानसातील आपली प्रतिमा उजळवण्याचे काँग्रेसचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे नुकतेच भव्य हनुमान मंदिर बांधले आहे. यामुळेच ते आता स्वत:ला हनुमानाचा भक्त म्हणवून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यापुर्वीही कमलनाथ यांनी आपले ट्विटर प्रोफाइल पिक्चर बदलण्याचे अचूक टायमिंग साधले होते. या फोटोमध्ये ते भगवे उपरणे परिधान करुन उभे असल्याचे दिसत होते. त्यांनी त्यावेळी प्रोफाईलमध्ये शिताफीने राम आणि हनुमानाचे स्मरण केले होते. याशिवाय त्यांनी भोपाळ येथील आपल्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण केले होते. काँग्रेसचा धर्माच्या मुद्द्याचे राजकारण करण्याच्या भाजपच्या प्रांतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न या सर्व प्रकारांमधून स्पष्ट दिसत आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ‘राम वनगमन पथ’चा समावेश केला होता. यामध्ये वनवासात असताना रामाचा चरणस्पर्श झालेल्या स्थळांचा विकास करण्याची योजना मांडली होती. मागील निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या कमलनाथ सरकारने यासाठी त्या वेळच्या बजेटमध्ये 22 कोटी रुपयांची खास तरतूदही केली होती. मात्र 15 महिन्यांमध्येच कमलनाथ सरकार पाडून शिवराजसिंह चौहान सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा ‘राम वनगमन पथा’चे काम आता प्रगतीपथावर असून अध्यात्म विभागाकडून सांस्कृतिक विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजकीय पक्ष हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी धर्माचा अवलंब करत आहेत. भाजप अनेकदा काँग्रेसला ‘इलेक्टोरल हिंदू’ म्हणत आहे. त्याच वेळी गेल्या निवडणुकीपासून काँग्रेस भाजपच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यात व्यस्त आहे. 2018 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या रामभक्तीचे प्रदर्शन करणारी होर्डींग्ज राज्यभर पहायला मिळाली. याव्यतिरिक्त त्यांनी चित्रकूट येथे भगवान कामतनाथांचे दर्शन घेतले होते. नुकत्याच पार पडलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानही राहुल यांनी उज्जैनमध्ये महाकालाचे दर्शन घेतले होते. मध्य प्रदेशच्या राजकारणात धर्माची छटा ही काही नवी बाब नाही.
गेल्या निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस सरकारने नर्मदा विकासासाठी समिती स्थापन करून संगणक बाबा उर्फ नामदेवदास त्यागी यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. मार्च 2018 मध्ये नर्मदा नदीच्या काठावर वृक्षारोपणात झालेल्या कथित घोटाळ्याबाबत एक यात्रा काढण्यात आली होती. त्यात शिवराजसिंह सरकारने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देवून त्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीत संगणक बाबांचा समावेश करून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र सरकार बदलल्यावर संगणक बाबांनी भाजप सोडून काँग्रेसशी हातमिळवणी केली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत संगणक बाबाने भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विरोध केला होता आणि दिग्विजयसिंह यांना विजयी करण्यासाठी मिर्ची यज्ञ केला होता.
या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात धीरेंद्र शास्त्री आणि निवेदक प्रदीप मिश्रा हे दोन धर्मगुरू केंद्रस्थानी आहेत. भाजप आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज गेल्या काही काळात धीरेंद्र शास्त्री यांच्या बागेश्वर धाम आश्रमात पोहोचले आहेत. त्यात भाजप खासदार मनोज तिवारी, मध्य प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते अरुण यादव, माजी मुख्यमंत्री आणि पीसीसी प्रमुख कमलनाथ आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा इत्यादींचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेही अलिकडेच बागेश्वरधामला पोहोचले. तेथे आयोजित करण्यात आलेल्या 121 गरीब मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. निवडणुकीच्या वर्षात राजकीय पक्ष बहुसंख्य मते मिळवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री दरबारात उपस्थित असतात. निवेदक प्रदीप मिश्राही यापूर्वी चर्चेत राहिले आहेत. सिहोर जिल्ह्यात 16 फेब्रुवारीपासून रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार होते. त्यामध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबेश्वर धाम येथे होणार्या या कार्यक्रमात पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा सांगण्याची योजना होती. मात्र कार्यक्रमापूर्वीच डझनहून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या. यावरून सीहोरचे आमदार रमेश सक्सेना यांनी भाजप सरकारला पंडित प्रदीप मिश्रा यांचा हेवा वाटत असल्याचा आरोप केला होता. दोन्ही पक्ष धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक नेत्यांच्या भेटी घेऊन हिंदू मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोहितांसाठी धर्मसंवाद सारखे कार्यक्रम आयोजित करून काँग्रेस राज्यात ब्राह्मण मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 40 लाख ब्राह्मण मतदार आहेत. हे प्रमाण एकूण व्होटबँकेच्या दहा टक्के आहे. याचा थेट परिणाम विंध्य, महाकौशल, चंबळ आणि मध्य प्रदेशमधील 60 हून अधिक जागांवर होऊ शकतो. नियोजित निवडणुकांमध्ये ब्राह्मण मते काँग्रेसच्या बाजूने आली तर पक्षासाठी विजयाचा मार्ग सुकर होईल. त्यासाठीच काँग्रेस हिंदू मतांचे लांगुलचालन करु लागली आहे.