आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
| माणगाव | प्रतिनिधी |
टोलचे हजारो कोटी जनतेकडून वसूल करायचे, जाहिरातींवर खोक्यांनी उधळपट्टी करायची आणि कोकणवासीयांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावणारे हे सरकार आहे, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले.
गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था सुधारलेली नाही. खड्डे, चिखल, महाकाय डबकी आणि पाण्याने भरलेले भुयारी मार्ग यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महामार्गावरील विविध ठिकाणांची पाहणी करून प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. माणगाव परिसरात बोलताना ठाकरे यांनी पुलावर लावण्यात आलेल्या जाहिरातींचा समाचार घेतला. पालकमंत्री झाले म्हणून याच पुलावर चांगले बॅनर लागलेत. बॅनरची क्वालिटी ए-वन आहे आणि रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी आहे! असा बोचरा टोला त्यांनी लगावला. नुकतेच उद्घाटन झालेल्या पुलावर स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर पूल पुन्हा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी महामार्ग सुरक्षित आणि खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
अंडरपासमध्ये पाणी की तलाव?
डोलवी येथील भुयारी मार्गाची अवस्था पाहून ठाकरे संतप्त झाले. अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून एखादा मोठा पाण्याचा डोह असल्यासारखा अंडरपास दिसतो; या पाण्यात मासेही दिसत आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तुंबलेल्या पाण्यातूनच स्थानिक नागरिकांना दररोज मार्ग काढावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी ठाकरे यांना सांगितले.
दौरा जाहीर होताच खड्डे बुजवण्याची नौटंकी?
वारसगाव येथे ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच खड्ड्यांमध्ये खडी टाकून डागडुजी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. दौरा जाहीर होताच प्रशासनाची सक्रियता जागी होते; हीच सक्रियता आधी का दाखवत नाही? असा सवाल त्यांनी केला.
दोन महिन्यांत पूल बंद!
नागोठणे उड्डाणपुलाचीही त्यांनी पाहणी केली. दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला पूल मागील महिनाभरापासून पुन्हा बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आधी उद्घाटनाचा गाजावाजा, त्यानंतर पूल बंद झाला. मग जनतेच्या पैशांचा हिशेब कोण देणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मंत्रीपद, गाडी,बंगल्यासाठी भांडतात; रस्त्यांसाठी कोण भांडणार?
राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, गेली दोन वर्षे पालकमंत्रीपद, मंत्रिपद, बंगला आणि गाडी यावरून वाद सुरू आहेत; मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवायला कोणी तयार नाही.कंत्राटदार काम अर्धवट सोडून पळून जाणार असतील तर सरकारचा उपयोग काय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्गासाठी विविध तंत्रज्ञानाच्या घोषणा करतात; मग प्रत्यक्ष रस्त्यावर खड्डे आणि डबकीच का? असा सवाल त्यांनी केला.
आश्वासनांचीच महामार्गावर सवारी!
गेली दहा वर्षे प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार, असे ऐकतोय,अशी टीका ठाकरे यांनी केली. मंत्री येतात, पाहणी करतात, प्रशासन डागडुजी करून जाते आणि पुन्हा काही दिवसांनी रस्ता जैसे थे असा कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
