विठ्ठल सोळंके
पारख्यांनाही प्रश्न पडावा अशी काही रत्ने उपजत असतात. त्या रत्नांचा अभ्यास केल्यानंतर कुणाला ती अष्टपैलू, तर कुणाला अष्टशतपैलू भासू लागतात. महाराष्ट्र ही अशा अनेकविध रत्नांची खाणच आहे़ ज्या रायगडाने रयतेच्या राज्याचे स्वराज्य फुलविले, त्याच रायगडाच्या मातीत असेच एक रत्न 07 जुलै 1955 रोजी उपजले आणि स्वराज्याच्या विचारांचा वसा आणि वारसा जपत मोठे झाले, ते म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आदरणीय जयंतभाई पाटील यांचा उल्लेख करता येईल. ज्या शेतकरी, कामगार वर्गाच्या संपूर्ण जीवनात काबाडकष्टच असतात, अशा काबाडांच्या धन्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्याही जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत, त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी प्रयत्न करत असणार्या पक्षाचे ते नेतृत्व करतात आणि आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. असे म्हणतात की,
जिंदगी जिना आसान नही होता, बिना संघर्ष कोई महान नही होता, जबतक न पडे हथौडी की चोट, पत्थर भी कभी भगवान नही होता
याप्रमाणे संपूर्ण जीवनभर ऐशोआरामात जगता येईल एवढे ऐश्वर्य आणि समृद्धी असतानादेखील भाई शेतकरी कामगार वर्गाच्या हितासाठी संघर्ष करत आहेत. यांत्रिकीकरण, नागरीकरण व शासनाचे भांडवलदारधार्जिणे धोरण यामुळे शेतकरी, कामगार वर्गापुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कृषीविषयक बदलत्या परिस्थितीचा व पद्धतीचा दुरगामी परिणाम या वर्गाच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रतिष्ठा, पैसा आणि सत्ता मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राजकारण, असा समज हाणून पाडत सत्ता कोणतीही असो, तिला आपल्या तालावर नाचविण्याचे काम भाई करु शकतात़ पण, प्रतिष्ठेचा आणि सत्तेतून पैसा उभारण्याचा प्रयत्न भाईंनी कधीच केला नाही. एक चांगले उद्योगपती असतानाही कामगारांच्या जीवनात आनंद यावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. नोकरशाहीकडून कामे करताना कोणतीही चिरीमिरी न देता, न घेता भाई नोकरदारांची मंत्रालयापर्यंतची शासकीय कामेही तेवढ्याच आस्थेने करीत असल्याने ग्रामस्तरापासून मंत्रालयापर्यंतच्या सर्व कर्मचार्यांनादेखील भाई आपले वाटतात. शब्द पाळणारा नेता म्हणून जनसामान्यांमध्ये भाईंची ओळख कायम आहे. सर्वांशी पोटास लावणे, हा जसा स्वराज्याचा जाहीरनामा होता, तसे अनेकविध उद्योगांतून रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठीदेखील भाईंची धडपड चालू आहे. उद्योगांसोबतच शिक्षणातूनदेखील समृद्धी येते, हा फुले-शाही-आंबेडकर यांच्या विचारांचा वसा घेऊन भाई शिक्षण संस्थांचे संचलनही उत्तम प्रकारे करतात.
शासनाचे विनाअनुदानाचे धोरण शिक्षक, कर्मचारी वर्गाचे जीवन उद्ध्वस्त करु पाहात असताना, संस्थेत नोकरी लावताना कोणतेही डोनेशन न घेता शासकीय अनुदान येईपर्यंत स्वत:च्या खिशातून शिक्षकांना पगार देणारे भाई महाराष्ट्रासाठी आधुनिक फुले आणि कर्मवीर आहेत, असेच म्हणावे लागेल. काही संस्था चालकांनी शैक्षणिक संस्थांना आपल्या उपजीविकेचे साधन बनविल्याबद्दल भाई आपल्या भाषणातून खंत व्यक्त करत. अशा संस्था चालकांवर कडक शब्दात हल्लाही चढवितात. स्वराज्याचे विचार लक्षात ठेवून रयतेच्या सुखासाठी प्रयत्नशील असणारा नेता म्हणूनदेखील आपणास भाईंकडे बघता येईल.
ज्येष्ठ साहित्यिक फ.मुं. शिंदेंनी शेतकरी कामगार यांच्या चळवळीचे विवेचन करताना आपल्या भाषणातून एकदा म्हटले आहे की, प्रचंड वैचारिक बळ घेऊन श्रमाची सार्थकता जोडण्यासाठी आंदोलने होतात, चळवळी उभ्या राहतात, भूमिकांचे स्फोट घडतात, चळवळींना हे नवीन नसले तरी नव्यानं पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन घडणं चाललेलं असतं. या सर्वांचा केंद्रबिंदू माणूस असतो. इथं तो श्रमिक माणूस असतो, तो जिवंत असतो. जे जिवंत असतात, त्यांना त्यांच्या परीने जाणीव होत राहते. जाग येणे हेही जिवंत असण्याचे झोपेतही कळणारे वैशिष्ट्य आहे. चित्रदर्शी आणि चित्तनिद्रा यातला हाच तो फरक आहे. शेतकरी कामगारांचं जगणं चिरनिद्रेत ढकलून देण्याची कारस्थानं उलटून टाकण्यासाठी निद्रा त्यागून चित्तावर येणं गरजेचं असतं.
भाईंसारखी या विचाराने प्रेरित काही मोजकीच मंडळी आपल्या संवेदना जागृत ठेवून या शेतकरी कामगार वर्गाच्या प्रश्नांसाठी लढत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक व्यक्ती, पक्ष, संघटना जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी प्रयत्न करीत असताना भाई मात्र या जंजाळापासूनही दूर असल्याचे लक्षात येते. भाईंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊन वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट म्हणून भाईंकडे एवढीच माफक मागणी करु इच्छितो, की, भाईंनी आपल्या कार्याची, पक्षाची, चळवळीची, विचारांची जाणीवपूर्वक प्रसिद्धी करुन शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी काम करणार्या कार्यकर्ते आणि नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहावे.