। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ही सोडत शुक्रवारी ( दि. 9 फेब्रुवारी ) होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
अलिबागमधील 34, मुरूड चार, पेण 18, पनवेल 15, उरण चार, कर्जत 30, खालापूर तीन, रोहा 26, सुधागड सहा, माणगाव 21, तळा 18, महाड 30, श्रीवर्धन 16 व म्हसळयामधील 11 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम 6 ऑक्टोबर ते 16 जानेवारी या कालावधीत पार पडला. त्यामध्ये गावाचे नकाशे अंतिम करणे, सीमा निश्चित करणे, प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रभाग प्रारुप रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी पाठविणे, त्याची दुरुस्ती करून मान्यता देणे , प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेणे, अभिप्राय नोंदविणे,अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणे, प्रभाग रचना अंतिम करणे अशा अनेक प्रकारची कामे या कालावधीत झाली. त्यानंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांचे निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे डोळे लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्या जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 9 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानुसार तालुका स्तरावर महसूल विभाग कामाला लागला असून ही प्रक्रिया पारदर्शक व योग्य पध्दतीने पार पाडण्यासाठी बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. नऊ फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण काढले जाणार आहेत. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसुचनेला जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता देणे, 13 फेब्रुवारीला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे, आरक्षण निश्चितीसाठी हरकती व सुचना 16 फेब्रुवारीपर्यंत दाखल करणे, प्राप्त हरकतीवर उपविभागीय अधिकारी यांनी 21 फेब्रुवारी रोजी अभिप्राय देणे, त्यानंतर अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे आदी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.