माजी आ. पंडित पाटील यांचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्य सरकारने ग्रामसडक योजनेसाठी फार मोठा निधी मंजूर केला आहे. प्रत्यक्षात मात्र निधी नसल्याने ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत. मार्च महिना संपण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. महत्वपूर्ण असलेली योजना निधीअभावी रखडल्याने गावांतील विकासाला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे.
रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून निधी न आल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे बंद पडली आहेत. नागपूरचे अधिवेशन झाल्यानंतर निधी दिला जाईल असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र या निधीची फाईल अर्थ विभागात अडकून राहिली असल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. करोडो रुपयांची घोषणा करून सरकार जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत आहे. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी निधी न देता नव्या कामांच्या निविदा काढल्या जात आहे. सरकारच्या या शोबाजीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
जिल्हा नियोजन मंडळाकडील निधी सरकारने घेतला आहे. तो का वितरीत केला जात नाही. गावांतील विकास कामांसाठी नाबार्डमार्फत मिळणारा निधीही दिला जात नाही, त्यामुळे अनेक विकास कामे थांबली आहेत, असा आरोप पंडित पाटील यांनी करीत सरकारने याकडे लक्ष देऊन तातडीने रस्त्यांच्या कामांचा निधी वितरीत करावा अशी मागणी केली आहे.