टाकाचीवाडी येथे बिबट्यानी केली बेल्ल्याची हत्या

आर्थिक मदतीची शेतकर्‍याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भडवळ टाकाचीवाडी येथील शेतकर्‍याचा बैल जंगलातील बिबट्याने केलेलया हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे माथेरानच्या पायथ्याशी निर्माण झालेल्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वन विभागाने त्या शेतकर्‍याला आर्थिक मदत व्हावी यासाठीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.


भडवळ टाकाचीवाडी येथील आदिवासी शेतकरी हिरु धर्मा शिंगवा यांचा शेतीची कामे करण्यासाठी नांगराला बांधण्यासाठी वापरला जाणारा बैल 2 मे रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता. त्यांचा बैल सायंकाळी ममदापुर वाडी भागातील जंगलात चरायला गेला होता. त्यावेळी बैल घरी आला नाही म्हणून शिंगवा यांनी शोधाशोध केली असता तो बैल जखमी अवस्थेत जंगलात सापडला. मात्र त्यावर उपचार सुरु करण्याआधी त्या बैलाचा मृत्यू झाला होता. सदर बैलाची चिंचवली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सलगर यांनी तपासणी केली. त्यावेळी त्या बैलावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वन विभागाच्या माथेरान वन क्षेत्रातील नेरळ वन परिघाचे वनपाल एस.एच.म्हात्रे यांनी संबंधित जनावरांचे मालक हिरु धर्मा शिंगवा यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.संबंधित बैलाचे मालक यांचे पावसाळा सुरु होण्याआधी मोठे आर्थिक नुकसान बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याने झाले आहे.
तर बिबट्याचा वावर माथेरान च्या पायथ्याशी असलेल्या टाकाचीवाडी, ममदापुर वाडी भागात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यात सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील प्राणी हे पाण्याच्या शोधात खाली मनुष्य वस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी यांनी आपल्या घरी असलेल्या पशूंची काळजी घ्यावी अशा सूचना वन विभागाने केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बकर्‍या फस्त करण्यात आल्या होत्या.

Exit mobile version