जमिनीसाठी योग्य त्या मोबदल्याची मागणी
पर्यावरणाचाही प्रामुख्याने विचार
। महाड । प्रतिनिधी ।
किल्ले रायगड परिसरात विविध विकासकामांकरिता डोंगर उतारावरील जमिनींचे भूसंपादन करण्यात येत आहे. मात्र, जमिनीच्या संदर्भाती धनदांडगे, भूमाफिया यांची भूमिका तसेच पर्यावरण याचा प्रामुख्याने विचार करत स्थानिकांनी याला विरोध दर्शविला आहे.
यासंदर्भात रायगडवाडी, हिरकणीवाडी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचेकडे सूपुर्त केले आहे.
भारतीय गौरवशाली इतिहासापैकी मराठ्यांचा शौर्याचा साक्षीदार तसेच शिवपाईकांचे श्रद्धास्थान असणार्या रायगड किल्ल्यांचा विकास रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे. यासाठी परिसरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आला असून, यापैकी काही कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गडावरील ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याबरोबर किल्ल्याला भेट देणार्यांसाठी गडपरिसरात सोईसुविधा निर्माण करण्यात येणार आहे आहे.
तसेच गडाच्या परिसरांमध्ये वाहनतळ, शौचालये, वीज व्यवस्था, निवास व्यवस्था इत्यादी सुविधा निर्माण करण्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे. मात्र गडाचा सभोवतालचा परिसर डोगर उताराचा असल्याने या सुविधा निर्माण करण्याकरीता सलग जागा मिळणे अशक्य झाले आहे. किल्ले रायगडच्या परिसरात बहूतांशी शेतकरी कुटुंबे निवास करीत असून, त्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत शेतीच आहे.
मागिल 10 ते 15 वर्षात स्थानिक महसुल विभागाला हाताशी धरुन धनदांडगे आणि भूमाफीयांनी पडिक जमिनी मातीमोल भावांमध्ये खरेदी केल्या आहेत. भविष्यात कोट्यावधी रुपयांचा नफा मिळणार असल्याने शासनाच्या विकासाच्या कामाकरीता धनदांडगे जमिनी देण्यास तयार नाहीत. या उलट महसुल विभागाच्या अधिकार्यांना हाताशी धरुन गरीबांच्या डोंगर उतारावरील जमिनी संपादीत करण्याचा डाव सुरु झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
याबाबत स्थानिकांनी आक्षेप नोंदविला असून, हे भूसंपादन करण्यात येवू नये, अशा आशयाचे निवेदन महाडच्या प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच रायगडच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेल्या पाचाड येथे शिवसृष्टी करीता संपादीत करण्ंयात आली आहे. त्यांतील सुमारे चाळीस टक्यापेक्षा अधिक जमीन तीव्र उतारावरील आहे.
अशा प्रकारे रायगडवाडी मधील सर्वे क्रमांक 158/0, 78/1अ, 78/1ब, 78/2ब, 78/2ड, आणि इतर क्षेत्र असलेल्या जमीनी वाहान तळा करीता संपादीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांना समजताच डोगराला तीव्र उतार असताना या ठिकाणी वाहान तळ कश्या प्रकारे उभा करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच बरोबर डोगर उतारावरील माती काढल्यास पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित होणार असल्याचे निदर्शनला आणुन देण्यांत आले. डोगर उतारावर असलेली झाडे तोडून जमीनी संपादीत करण्याला विरोध असुन हा निर्णय रद्द करण्यांत यावा, जमीनीची रक्कम अदा करण्यांत येऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या परिसरांतील जमिनींचा सर्वे करण्यांत येऊन जमिनींचे संपादन करण्यात यावे. अवैध अशा भूसंपादनास आमचा विरोध होता, आहे आणि राहील. – प्रेरणा सावंत, सरपंच, रायगडवाडी ग्रामपंचायत
या परिसरांतील जमिनी या पूर्वी स्थानिक महसुल विभागांतील अधिकारी आणि भूमाफीया संगनमताने स्थानिक शेतकर्यांची फसवणुक करुन ताब्यात घेतल्या आहेत. या पुढे असे प्रकार झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल. – अजित औकीरकर, सामाजिक कार्यकर्ते, महाड-रायगड
विधायक पद्धतीने होणार भूसंपादन
महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड यांनी याबाबत खुलासा करीत असताना असे प्रतिपादन केले आहे की, पूर्वी झालेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत सद्यःस्थितीत फारशी माहिती नाही. परंतु किल्ले रायगडच्या परिसरांतील जमीन डोगर उतारावरील असल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन विधायक पध्दतीने जमीनी संपादीत करण्ंयात येतील.