अलिबागमध्ये 90 टक्के दुकाने बंद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उत्तर प्रदेशमधील शेतकरी अंदोलनात केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा पुत्र अभिषेक मिश्राने वाहन अंगावर नेवून 8 शेतकरी चिरडण्याच्या दानवी कृत्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजपा वगळता सगळेच पक्ष या आंदोलनात सहभागी झाल्याने व्यापार्यांनी देखील सहकार्याची भुमीका घेत सकाळच्या वेळेत आपापली दुकाने बंद ठेवली. अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्षासह महाविकास आघाडीच्या वतीने निषेध रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. शेकापक्षाच्या आवाहनानंतर शहरातील व्यापार्यांनी सहकार्याची भुमीका घेत दुकाने बंद ठेवत सहभाग घेतला. यावेळी महावीर चौकात झालेल्या चौक सभेत सर्व नेत्यांनी मोदी सरकाचा निषेध व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष अॅड मानसी म्हात्रे, काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड प्रविण ठाकूर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड श्रद्धा ठाकूर, राजेंद्र ठाकूर, अमीर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, उपाध्यक्ष जयेंद्र भगत, शेकापक्ष शहर चिटणीस अशोक प्रधान, सभापती अजय झुंजारराव, राकेश चौलकर, नगरसेवक अॅड गौतम पाटील, सुषमा पाटील, अश्विनी पाटील, शहर महिला आघाडी प्रमुख पल्लवी आठवले, अलिबाग शहर पुरोगामी युवक संघटना चिटणीस मंदार सिनकर, माजी नगरसेविका कविता ठाकूर, अॅड महेश ठाकूर, अॅड सुजय घरत, आपचे दिलीप जोग, राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस मानसी चेऊलकर, जिल्हा संघटक रुषीकांत भगत, जिल्हा चिटणीस शैलेश चव्हाण, युवक तालुका अध्यक्ष मनोज शिर्के, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. जोगळेकर नाका येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळून सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचे महावीर चौकात आगमन झाल्यानंतर तिचे रुपांत चौक सभेत झाले. यावेळी अॅड श्रद्धा ठाकूर, दत्ता ढवळे, दिलीप जोग, अॅड प्रविण ठाकूर, अॅड गौतम पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत योगी तसेच मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार बंद आहेत. या बंदला आधी काही व्यापार्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापार्यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे सकाळपासूनच सर्व व्यापार्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंद0ला चांगला प्रतिसाद दिला.