। मुंबई । प्रतिनिधी ।
पाटना बिहार येथे होणार्या 48 व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ मुंबई उपनगरच्या सानिका परेश पाटील हिच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 30) पटण्याला रवाना होणार आहे. गेले दहा-बारा दिवस कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर त्यांनी सराव केला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून ते सकाळी 11 वाजता सुविधा एक्सप्रेसने पटण्याला जाणार आहेत.
1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत पटण्यातील पाटलीपुत्र बंदिस्त क्रीडा संकुलात हे सामने होतील. प्रशिक्षिका वर्षा भोसले, फिजिओ ट्रेनर महेश गावडे यांनी सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात खेळाडूंचा कसून सराव करून घेतला आहे. संघाचा सराव उत्तम झाला असून संघ पहिल्या चार संघात स्थान मिळवेल, अशी खात्री प्रशिक्षिका भोसले व ट्रेनर महेश गावडे यांना वाटते. गतवर्षी साई संघाकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे महाराष्ट्राच्या मुलींना तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्राच्या मुलींचा ड गटात समावेश असेल. आज या संघाला राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यालयात सचिव आस्वाद पाटील यांच्यावतीने पुष्प देऊन स्पर्धेकरिता शुभेछा देण्यात आल्या.