कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर यांचे प्रतिपादन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
150 वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज व सार्वजनिक सत्यधर्मच्या माध्यमातून नवीन समाज निर्माण करण्याची दिशा दिली, असे प्रतिपादन कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर यांनी दि.13 व 14 जानेवारी रोजी जे.एस.एम. महाविद्यालयामध्ये ‘गुलामगिरी’ व सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भाषा व सामाजिक शास्त्र व अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
महात्मा फुले यांना विद्या ही संशोधनावर व ज्ञानावर आधारित अपेक्षित होती. त्यांनी स्त्री-पुरुष समतेवर भर दिला होता. महात्मा फुले यांनी साम्राज्यवादावर परखड टीका केली होती. त्यांनी पर्यावरणविषयी, शेतीविषयी चिंतन व विश्वबंधुत्व संकल्पना आपल्या विविध ग्रंथातून प्रकट केली होती असे कॉम्रेड पाटणकर यांनी पुढे सांगितले. आपल्या भाषणाच्या शेवटी डॉ. भारत पाटणकर यांनी आवाहन केले की महात्मा फुले यांचे विचार आपल्या आचरणात आणून क्रियाशील होणे ही वर्तमानकाळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषण करताना अॅड. गौतम पाटील यांनी म्हटले की, आज समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला जात आहे. ते पुढे म्हणाले, विचार कधी मरत नाही, फुले, शाहू, आंबेडकर, गांधींजी यांचे विचार आजही जिवंत आहेत. आज आपल्याला या विचारांची जीवनात अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असे मत अॅड. गौतम पाटील यांनी व्यक्त केले.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठ फुले आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. अनिल सपकाळ, मुंबई विद्यापीठ मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन, प्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे, कला शाखाप्रमुख प्रा.पी.डी.दातार उपस्थित होते. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये दोन दिवस विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले गेले. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील सुमारे 85 प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी सर्व सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. चर्चासत्राचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.