। पनवेल । वार्ताहर ।
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या महाविकास आघाडीच्या महाबंदला पनवेलमधील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा बंद यशस्वी केला. महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी सकाळी पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन भाजपच्या क्रूर सरकारचा निषेध नोंदविला.
यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, काँग्रेसचे आर.सी.घरत, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, प्रभाकर कांबळे, राष्ट्रवादीचे आनंद भंडारी, यतीन देशमुख, काँग्रेसचे वैभव पाटील, बबन विश्वकर्मा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लखीमपूर येथील घडलेली घटना ही देशातील नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारी आहे, आम्ही शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करीत असताना शेतकर्यांच्या समस्या काय आहेत याची आम्हाला जाणीव आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात देश वाचविणार्या शेतकर्यांनाच असुरक्षित वाटत असेल तर हे देशाचे मोठे दुर्भाग्य आहे. – प्रभाकर कांबळे (पनवेल शहर जिल्हा सहचिटणीस, शेकाप)
- लखीमपूर येथे घडलेली दुर्घटना निषेधार्थ असून या भाजप सरकारचा देशातील नागरिकांनी समाचार घेणे गरजेचे आहे. आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो बंद पुकारलेला आहे, हा बंद नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आहे. – प्रीतम म्हात्रे (विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका)