आंबा व्यावसायिक करणार धरणे आंदोलन

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
सातत्याने निवेदनाद्वारे पाठपुरवठा करुनही, शासनातर्फे आवश्यक ती दखल घेतली न गेल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबा व्यावसायिक मुंबईतील आझाद मैदानावर 23 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या आंदोलनाबाबतची माहिती आंबा व्यावसायिक बावा साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात हापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही, म्हणून कोकणातील शेतकर्‍यांनी हा पवित्र घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील आंबा, काजू, नारळ इ. फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजुर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली 15 वर्षे ऋतुचक्रात बदल झाला असून वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण या बरोबरच रासायनिक प्रदुषण यामुळे बागायतदार शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान होत आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहोर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहोरावर किड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करुन आंबा, काजू व्यवसायीकांनी पिक कर्ज घेतली. निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडुन वसुलीचे मार्ग अवलंबुन शेतकर्यांकडून सक्तिने कर्जवसुली करण्याबाबतची कार्यवाहीही शेतकर्यांच्या जमिनी हडप करण्याच्या हेतुने केली जात आहे. कर्ज पुर्नघटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे.कोरोना कालावधीतही बागायतदार अडचणीत आले असतानाच गतवर्षी कोरोनामुळे निर्यात होऊ शकली नाही. त्याचा भार स्थानिक बाजारपेठेवर पडला होता. परिणामी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. अनेक बागायतदारांची कर्जे थकित असून बँकांनी वसुलीच्या नोटीस धाडल्या आहेत. कर्ज भरले नाही तर मालमत्तेवर टाच आणण्याची तयारीही बँकांनी केली आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर आत्महत्या करण्याची वेळ सर्वसामान्य बागायतदारांवर येऊ शकते. यासाठी शासनाने वेळीच लक्ष घातले पाहीजे. बागायतदारांना या परिस्थितीत शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

Exit mobile version