नरेंद्र पाटील यांचा सरकारला इशारा
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत माथाडी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनावर धडकणार असल्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. माथाडी कामगारांच्या शासन दरबारी विविध विभागात प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे वेधण्यासाठी तमाम माथाडी आणि व्यापारी यांनी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता, त्यावेळी माथाडींना संबोधताना ते बोलत होते.
यावेळी नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून माथाडींच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे असताना देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे वारंवार या मागण्यांबाबत पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी, तसेच व्यापारी सहभाग नोंदवून नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, कडकडीत बंद ठेवला होता. माथाडी कामगार हा असा घटक आहे जो मेहनत करून त्यांच्या कामाचे मोल मागत आहे. माथाडी कामगार कायदा टिकवण्यासाठी संयुक्तपणे बैठक घ्यावी, अशी मागणी केली.
माथाडी बोर्डात माथाडीच्या मुलांना नोकर्या द्याव्यात. माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये माचाही सल्लागार समितीची पुर्नरचना पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, सुरक्षारक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणार्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह खात्याने संबंधितांची समिती करावी व पोलीस संरक्षण इत्यादी मागण्या आहेत.