। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात आता राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बर्याच घडामोडी घडत आहेत. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी( 8 जून) महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत महत्वाचं मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीबरोबरच काँग्रेसनं देखील उद्या काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्य सभा निवडणुकीसाठीचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरिक्षक मल्लिकार्जुन खर्गे हे या बैठकीत काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मतदानासाठी देशमुख, मलिकांचे अर्ज
सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे या अर्जावर मंगळवारी उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने इडीला दिले आहेत. त्यानंतरच सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायलायने दिली आहे. विविध घोटाळ्याप्रकरणी हे दोन्ही नेते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.