मनसे नेहमीच लोकांसाठी झटत असतो – आ. राजू पाटील

कर्जत | प्रतिनिधी |
निवडणुका समोर ठेऊन आम्ही काम करीत नाहीत तर समाजासाठी झटणार्‍या लोकांसाठी मनसे झटत असते,असे प्रतिपादन आम.राजू पाटील यांनी केले आहे. मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून डिकसळ ते उमरोली येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेच्या पथदिव्याचे लोकार्पण, संपर्क कार्यालयाचे उदघाटन व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन उमरोली येथे करण्यात आले होते. पहिल्यांदाच कर्जत तालुक्यात आलेल्या आमदार राजू पाटील यांचे तालुक्यातील शेलू, नेरळ, दहिवली, बिरदोले, बेकरी, माणगाव, अशा अनेक गावात जोरदार स्वागत करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. आमदार पाटील यांनी मानवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांच्या प्रति नतमस्तक झाले. तसेच हुतात्मांचे नातेवाईकांची त्यांनी भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील डिकसळ ते उमरोली या याठिकाणी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पथदिव्यांचे लोकार्पण केले.

तसेच उमरोली येथे संपर्क कार्यालयाचे उदघाटन देखील केले. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष जे. टी. पाटील, महेंद्र निगुडकर, महिला जिल्हाध्यक्ष सपना देशमुख, कर्जत तालुकाध्यक्ष अंकुश शेळके, खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक, नगरसेवक हेमंत ठाणगे, माथेरान शहराध्यक्ष संतोष कदम, नेरळ शहराध्यक्ष मिलिंद मिसाळ, कर्जत शहराध्यक्ष समिर चव्हाण, उपाध्यक्ष यशवंत भवारे, अकबर देशमुख, विलास डुकरे, प्रवीण बोराडे, महेंद्र निगुडकर, उमरोली ग्रामपंचायत सदस्य प्रचिती गायकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर उमरोली येथील सर्वेश मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून त्यांनी तालुक्यातील बहुतेक सर्व पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. जे. टी. पाटील आणि साचिन कर्णूक यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेखर परदेशी यांनी केले.

Exit mobile version