गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात; प्रवासी जलसेवा होणार सुरळीत
। चिरनेर । प्रतिनिधी ।
प्रवासी, बोट मालकांनी सातत्याने केलेल्या मागणीनंतर कोटी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला तीन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे उरण-भाऊचा धक्का गाळात रुतलेली प्रवासी जलसेवा सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोरा बंदरात मागील अनेक वर्षांपासून गाळाची समस्या आ वासुन उभी आहे. बंदरातील गाळाच्या कायमच्या समस्येमुळे समुद्राच्या ओहोटीमुळे ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येते. कधीकधी चार-पाच दिवस प्रवासी वाहतूकच बंदच ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तर कधी कधी नवख्या सारंग-ड्रायव्हरमुळे बोटस गाळात रुतून बसतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून मोरा बंदरातील गाळ काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरायचे अद्यापही थांबलेले नाही. त्यामुळे मोरा बंदरातील साचत असलेल्या गाळाची समस्या कायम स्वरुपी दूर करण्यासाठी प्रवासी, मुंबई जलवाहतूक संस्था, बोट मालकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. अखेर बंदर विभागाने संबंधितांकडून केलेल्या मागणीची दखल घेतली आहे. तीन दिवसांपासून मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी नितीन कोळी यांनी दिली. तर गाळाची समस्या दूर झाल्यानंतर या सागरी मार्गावरुन वर्षभर प्रवास करणार्या सुमारे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया मुंबई जलवाहतूक संस्थेच्या पदाधिकार्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
तीन कोटी रुपये खर्चून मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मोरा बंदरातील गाळाची समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंदरात नेमका कोणत्या बाबी गाळाची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. त्यानंतर मोरा बंदरातील गाळाची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
प्रकाश चव्हाण
कार्यकारी अभियंता
मेरिटाईम बोर्ड मरिना विभाग