। धाटाव । शशिकांत मोरे ।
बाचाबाची, शिवीगाळमधून राग अनावर झाला आणि त्याच रागातून लाकडी दांडक्याचा फटका बसल्याने आदिवासी समाजातील 47 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री घडली. बेलवाडी आदिवासीवाडी येथील विश्राम राजाराम पवार याची हत्या केल्याने आदिवासी समाज यांसह सर्वहारा जनआंदोलन संघटना आक्रमक झाली. विश्राम पवार याच्या हत्येप्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ बिनधास्त धनावडे याला कोलाड पोलिसांनी तीन तासात बेड्या ठोकल्या. गावातील राकेश गायकवाड, संदीप गायकवाड यांनी पत्नी वनिता पवार यांना ही घटना सांगितल्यानंतर सारा प्रकार समोर आला असल्यावे वनिता विश्राम पवार हिने तक्रारीत नमूद केले.
कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील बेलवाडी आदिवासीवाडीतील विश्राम पवार यांचा रागाच्या भरात डोक्यात लाकडी दांडका मारून खून केल्याची घटना घडली. मारहाणीत विश्राम पवार बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय रोहा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार पत्नी वनिता पवार यांनी पोलिसांत केली. त्यानुसार आरोपी लक्ष्मण उर्फ बिनधास्त धनावडे याला विश्राम पवार यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व पोलीस अधिकारी करीत आहेत. दरम्यान, रागाच्या भरात आदिवासी व्यक्तीचा खून केला ही धक्कादायक बाब आहे. हत्येप्रकरणी संबंधीत आरोपीला कठोर शासन व्हावे. तपास जलद व्हावा अशी मागणी सर्वहरा जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी केली आहे.