वादळामुळे नारळी पौर्णिमेचा मासेमारी परंपरेचा मुहूर्त हूकला
। मुरूड । वार्ताहर ।
अरबी समुद्रात वादळी पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेली मासेमारी बंद पडली आहे. यामुळे नारळी पौर्णिमेला श्रीफळ देऊन मासेमारीस निघण्याची परंपरा खंडीत झाली आहे. परिणामी, वादळामुळे कोळी बांधवांनी केलेल्या पूर्व तयारीवर पाणी फेरले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
नारळी पौर्णिमेला समुद्रात श्रीफळ अर्पित करून शांत होण्याची मनोभावे प्रार्थना करण्यात येते. परंतु पोसणारा समुद्र खवळलेला असल्याने त्याला आव्हान देणे निसर्गाच्या नियमाविरोधात आहे. त्यामुळे समुद्र शांत झाल्याशिवाय मच्छीमार समुद्रात मासेमारीस जाणार नाहीत, अशी माहिती एकदरा कोळी समाज अध्यक्ष पांडुरंग आगरकर, रोहन निशानदार (रा.एकदरा), ओंकार भगत, राजेंद्र रामनाखवा( रा. मुरूड) यांनी गुरुवारी दिली.
1 ऑगस्ट पूर्वी हवामान कोरडे आणि स्वच्छ असल्याने कोळी बांधवांच्या सुमारे 150 नौका लाखो रुपये खर्चून मासेमारीसाठी गेल्या. खोल समुद्रात मासेमारी करीत असताना अचानक जोरदार वादळी वारे आणि पाऊस सुरू झाल्याने या नौका 7 ऑगस्टपासून आगरदांडा-दिघी बंदरात तातडीने परतल्या.राहिलेल्या 60 ते 70 नौका नारळी पौर्णिमेनंतर जाणार होत्या. परंतु वादळी परिस्थिती नारळी पौर्णिमेला देखील कायम असल्याने मासेमारीस जाण्याचा मुहूर्त हुकल्याचे मुरूड, एकदरा येथील अनेक मच्छीमारांनी स्पष्ट केले.
आठ दिवस विश्रांती
किमान 8 दिवस तरी मोठ्या मासेमारीचा विचार करणे अवघड आहे, अशा प्रतिक्रिया मच्छीमारांनी दिल्या आहेत. वादळी पाऊस आणि वादळी वार्यांपासून नुकसान टाळण्यासाठी 70 नौका पुन्हा प्लास्टिक ताडपत्री आच्छादून लॉकडाऊन करण्यात आल्या आहेत. या नौका किनार्यावर नांगर टाकून उभ्या असल्या तरी अचानक वाढणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाऊ शकतात. त्यामुळे डोळयात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. गेल्या वर्षी एकदरा-मुरूड खाडीत रात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढुन काही नांगरलेल्या नौका समुद्रात वाहून गेल्याची माहिती एकदरा येथील प्रत्यक्ष अनुभव घेतले मच्छीमार रोहन निशानदार व ज्येष्ठ मंडळींनी दिली.
100 नौकांचा आगरदांडा बंदरात आश्रय
राजपूरी बंदरातील 80 ते 100 नौका आठ दिवसापासून आगरदांडा बंदरात आश्रयाला गेल्या असल्याची माहिती गुरुवारी दुपारी राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार धनंजय गिदी यांनी दिली. गुरुवारी देखील मुरूड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. सिझनमध्ये मासेमारी ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अजूनही नुकसानीची शक्यता मच्छीमार नाखवा आणि खलाशांनी व्यक्त केली आहे. वादळ शमले तर ठीक अन्यथा मागील वर्षांप्रमाणे संकट ओढावण्याची अशी स्थिती येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी दर्या राजा शांत हो! अशी प्रार्थना श्रीफळ अर्पून करण्यात आली आहे.