। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
स्वच्छतेमधील नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी विविध मोहीमा व उपक्रम राबवत सर्व स्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत. त्यातच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार नुकत्याच आठही विभागांमध्ये महामार्ग, मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, दुर्लक्षित जागा याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. या मोहीमांतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजकांच्या कडेला जमा झालेली माती गोळा करुन हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नुकतीच ऐरोली विभागातील मुख्य रस्ते व प्रामुख्याने एमआयडीसी भागातील रस्ते तसेच स्वच्छता, डेब्रिज, दुभाजक, आयलँड, रस्त्याच्या साईडपट्ट्या अशा विविध बाबींची पाहणी केली. विशेष म्हणजे ही पाहणी त्यांनी सायकलवरुन केली आहे.
चारचाकी गाडीने जाताना प्रत्यक्ष स्थितीचा अंदाज येत नाही, त्यामुळे सायकलसारखे पर्यावरणपूरक वाहन वापरुन शहरातील स्थितीचा आयुक्त कार्यालयीन वेळीच्या आधी सकाळी लवकरच नियमित आढावा घेत असतात. नुकतेच त्यांनी संबधित अधिकार्यांना घेऊन कोणत्या भागाची पाहणी करणार याची पूर्वकल्पना न देता ऐनवेळी सांगत ऐरोली भागाची पाहणी केली. शहरातील मुख्य रस्ते हे आपल्या शहराचा आरसा असून खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आवश्यक तेथे सुधारणा तसेच त्यावरील माती उचलून हवा गुणवत्तेत सुधारणा करणे व स्वच्छता व सुशोभिकरण हे आपले प्राधान्य असले पाहिजे, असे निर्देश देत केवळ पाहणी केलेल्या भागाची नाही तर शहरातील सर्वच भागांची दिलेल्या सूचनांनुसार सुधारणा तत्परतेने हाती घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले आहेत.
या दौर्यांत त्यांच्या समवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 2 चे उपआयुक्त संतोष वारुळे, ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त अंकुश जाधव, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, मनोहर सोनावणे, प्रवीण गाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.