| पनवेल। वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईकर खोकला आणि घशाच्या खवखवीने हैराण केले आहे. वातावरणात होणार्या बदलांसह वाढलेल्या प्रदूषणामुळे हे प्रकार होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमधील वातावरणातील बदलामुळे सध्या खोकला, घशाची खवखव याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. त्यामुळे घशाची खवखव व खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
यासोबतच हवेत काहीसा गारवा पसरल्याने त्वचा कोरडी पडली जाते. त्यामुळे त्वचेला खाज येणे किंवा पुरळ उठणे अशा त्वचेबाबत समस्या देखील वाढल्या असल्याने त्याचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यातच दिवसभर ढगाळ तर कधी कडक उन्ह त्यातच रात्री बोचरी थंडी त्यामुळे बदलत्या वातावरणाचा फटका लहानांपासून ते वयोवृद्धांना देखील बसत आहे. नवी मुंबईमध्ये सध्या रात्री थंडी तर दिवसा कडक उन्हाळा असे वातावरण आहे. त्यातच हवामान घसरल्याने या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून नवी मुंबईतील नागरिकांच्या घशात खवखव वाढली असून, त्यांना खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे घशातील खवखव व खोकल्याच्या रुग्णांमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे कान-नाक-घसा रुग्णालयामध्ये वाढू झाली आहे. मात्र, काही दिवसांपासून यामध्ये घशाची खवखव, खोकला, सर्दी यासारख्या आजाराने त्रस्त असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहे. हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असून खासगी रुग्णालयात देखील नेहमीच्या रुग्णांच्या तुलनेत 20 ते 25 टक्के रुग्ण हे घशाची खवखव, खोकल्याचे येत आहेत.
आजार पसरण्याची कारणे
सध्या बदलत असलेले वातावरण, नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम आणि हवेतील परागकण यामुळे नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा गरमी तर रात्री थंडी असे वातावरण असल्याने त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळेच खवखव, खोकला, सर्दीसारखे आजार होत आहेत.