। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला नुकताच नवभारत ग्रुप तर्फे नवराष्ट्र सहकार पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी स्वीकारला आहे.
हा कार्यक्रम वाय बी चव्हाण सेन्टर, मुंबई नरिमन पॉइंट येथील रंगस्वर सभागृहात पार पडला. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार संजय राऊत, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारी, ना. विश्वजीत कदम अनुपकुमार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नवभारत ग्रुपचे संचालक मंडळ उपस्थित होते.
चिपळूण नागरी पतसंस्थेची 19 ऑक्टोबर 1993 ला स्थापना झाली आहे. या संस्थेने मआपली माणसे आपली संस्थाफ या वाक्याप्रमाणे सभासदांशी आपुलकीचे नाते ठेवले आहे. विशेष म्हणजे गरजवंताला अल्पावधीतच कर्जपुरवठा करीत आहे. यामुळे गरजवंताची कर्जाची गरज पूर्ण होत आहे. इतकेच नव्हे तर सुशिक्षित बेरोजगारांना सह शेतकर्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने या संस्थेने नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली आहे. यामुळे आजवर हजारो शेतकरी व सुशिक्षित तरुण स्वावलंबी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या संस्थेने अल्पावधीतच यश संपादन केल्याने या संस्थेला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेची यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. याकरता संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचारी वर्गाची देखील मोलाची साथ मिळत आहे.