फराळ साहित्याचे भाव वाढल
| रायगड | प्रतिनिधी |
हिंदू धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाची सुरुवात सोमवारी (दि. 22) घटस्थापनेने झाली. या सणातील नऊ दिवस-नऊ रात्रींचे महत्त्व लक्षात घेता अनेक महिला-पुरुष भाविक उपवास करतात. या उपवासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या फळे व विविध फराळ पदार्थांच्या भावात वाढ झाल्यामुळे यंदा नवरात्रोत्सवाचा उपवास महाग झाला आहे. तरीही उपवासासाठी तयार खाद्यपदार्थ बाजारात चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
नवरात्रोत्सवात काही कुटुंबातील सदस्य संपूर्ण नऊ दिवस उपवास ठेवतात, तर काही भाविक फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. यासाठी पारंपरिक घरगुती पदार्थ बनविण्याबरोबरच तयार फराळाचे पदार्थ बाजारातूनही खरेदी केले जातात. मागील काही वर्षांत फराळ पदार्थांची मागणी वाढली असून, साबुदाणा, शेंगदाणे यांसारख्या वस्तूंचे भावही वाढले आहेत. तयार फराळांमध्ये साबुदाणा चिवडा, बटाटा चिप्स आणि विक्री यांचे भावही वाढले आहेत. तसेच फळांमध्ये केळी, खजूर, बटाटा यांचेही भाव थोडेसे वाढले आहेत. नवरात्रोत्सवात अनेक लोक उपवास करतात आणि जेवण टाळून फराळ पदार्थ खातात. त्यामुळे सुरुवातीला उपवासामुळे खर्च कमी होईल असे वाटले, मात्र व्यापाऱ्यांनी उपवासाच्या पदार्थांचे भाव वाढवून त्याचा फायदा घेतल्यामुळे उपवासही आता महागडा ठरला आहे, जो सर्वसामान्यांसाठी सोपा नाही. उपवासासाठी वेगवेगळे फराळ पदार्थ आणि फळांचा आहार केला जातो. मागणी वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी दरवाढ केली आहे. उपवासाच्या पदार्थांमध्ये लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढले असून, फळेही अनेक ठिकाणी 100 रुपयांपेक्षा जास्त भावाने मिळत आहेत. रेडिमेड फराळ पदार्थांवर 15 ते 20 टक्क्यांपर्यंत भाववाढ झाली आहे.
साहित्य पूर्वी सध्या
शेंगदाणे 150 200 रुपये
भगर 140 180 रुपये
बटाटे 20 30 रुपये
साबुदाणा 80 120 रुपये
रताळी 60 90 रुपये
भुईमुगाच्या शेंगा 80 100 रुपये.






