मातीचे आरोग्य जपण्याची गरज

कृषी अधिकारी आनंद कांबळे यांचे प्रतिपादन

| तळा | वार्ताहर |

5 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जीवसृष्टी जगविण्यात मृदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, जमिनीचे आरोग्य जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणाव्यात, पिकांची फेरपालट, हिरवळीच्या खतांचा वापर करावा व मातीचे आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले.तळा तालुक्यातील महागाव येथे जागतिक मृदा दिनानिमित्त त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल दडेमल, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र रेपोली हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अधिक उत्पादकतेसाठी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. यामुळे जमिनीचा पोतदेखील खालावत असून, शेताच्या परिसरातील वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि त्याचे संवर्धन होण्याबरोबरच धूप कमी करण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, हिरवळीच्या खतांचा वापर वाढविण्याची गरज आहे. बांधावरील झाडांची संख्यादेखील वाढविणे गरजेचे आहे, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

जमिनीची पूर्वमशागत करून धूप कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जमिनीत पाणी व्यवस्थापन व पुनर्भरण करणे गरजेचे आहे. जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी जमिनीत जर 25 टक्के हवा, 25 टक्के पाणी व 50 टक्के खनिजे (माती) व सेंद्रिय पदार्थ, असे उपलब्ध झाले तर ती जमीन उपजाऊ होत असते, असेही त्यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमास सरपंच सुषमा कसबले, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, प्रभारी अधिकारी अमोल दडेमल, कृषी पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी, कृषी सहाय्यक दत्त दुधाटे, पोलीस पाटील कमलाकर मांगले, गाव अध्यक्ष कृष्णकांत मानकर, कृषी मित्र संतोष आमले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version