सर्वसामान्य नागरिकांचा संतप्त सवाल; खड्डेमय मुंबई-गोवा महामार्गावर वाहने चालविणे मुश्किल
| कोलाड | प्रतिनिधी |
रखडलेल्या राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्गावर पावसात भयानक खड्डे पडण्यास सुरू झाले असून, प्रवाशांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर, त्यात आता वाहने अडकून बंद पडत आहेत. याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मंत्री, पालकमंत्री आणि नेतेमंडळी या रस्त्याची पाहणी करण्याचा आव आणतात. राज्यातील अनेक मंत्री तसेच काही केंद्रीय मंत्र्यांनीदेखील गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या खास राष्ट्रीय महामार्गाला पसंती देत पाहणी दौरा केला. त्यात त्यांच्या अनेक डेडलाईनदेखील फोल ठरल्या. मात्र, महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण होत नसल्याने आता अधिक कोणी मंत्री या महामार्गाची पाहणी करण्यास शिल्लक राहिले आहेत का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करण्यासाठी अनेक ठेकेदार झाले. हा मार्ग तयार करण्यासाठी किती कोटींचा धुरळा उडाला, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कोटीच्या कोटी खर्च करूनदेखील काही ठिकाणी अपूर्ण कामांचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवासी नागरिक यांना बसत आहे, तर ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे मार्गालगतचे सर्व्हिस रोड, गटारे, लाईटची कामे आजही सुरू असल्याने ती अर्धवट कामे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
श्रावण सुरू झाला गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी या खड्ड्यांचे दर्शन घेण्यासाठी सदरील आमदार, खासदार, मंत्री आणि पालकमंत्री, बांधकाम मंत्री या महामार्गावर पोहोचतात, तेव्हा चोख बंदोबस्त आणि त्यांच्या चारही बाजूला अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गराडा, त्या गराड्यात मंत्र्यांनी दिलेले आदेश आणि फायली चाळत लिखापटी धावत धावत करणारे अधिकारी हे एकप्रकारे आता दिनक्रमच होऊन बसला आहे. मात्र, या खड्ड्यांबाबत नाही कुणा नेत्याला चिंता की नाही कुणा अधिकाऱ्याला त्याची काळजी, हे अनेकदा समोर आले आहे.
उदंड जाहले पाहणी दौरे
मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा यापूर्वीदेखील अनेकदा पाहणी दौरा झाला. रायगड हद्दीतील वडखळ ते इंदापूरदरम्यान अर्धवट अवस्थेत असलेली महामार्गाची कामे, त्यात भयानक पडलेले खड्डे, नागोठणे, खांब, कोलाड आंबेवाडी नाका, तळवली तिसे या ठिकाणी अक्षरशः मार्गाची चाळण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
खड्ड्यांमुळे किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले, किती ठेकेदारांवर काय करवाई करण्यात आली, या महामार्गाचे काम पूर्णत्वास का येत नाही, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आम्ही अधिकाऱ्यावर वचक ठेवण्यात कमी पडलो का, अशी कोणतीही प्रतिक्रिया या महामार्गावर पाहणी करणारे मंत्रीमहोदयांकडून का ऐकायला मिळत नाही, हे मात्र न उलगडणारे कोडेच झाले आहे.
– जयेश घावटे, सामाजिक कार्यकर्ते, कोलाड







