शेतकर्यांचा तोंडचा घास हिरावला, नुकसान भरपाईची मागणी
| दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते-दिवेआगर मार्गावरील यशवंती खारभूमीलगत असणार्या खाडीचे दरवाजे तुटल्याने तयार भात पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. कापून ठेवलेल्या पिकांची दैनाच झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
दिवेआगर खाडी लगत बोर्लीपंचतन परिसरातील चार ते पाच गावांतील अनेक शेतकर्यांची 400 हेक्टर क्षेत्रात खारशेती जमीन आहे. त्यात शेतकरी दरवर्षी भातशेतीचे उत्पन्न घेतात. समुद्राच्या खाडीतून शेतात समुद्राचे पाणी जाऊ नये यासाठी भक्कम दरवाजे असलेली सात उघडी आहे. मात्र, मागील चार वर्षात उधाणाच्या भरतीत होत असलेली मासेमारी यामुळे दरवाजे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जात आहे.
या समस्येवर कोणताच तोडगा निघत नाही. शेतकर्यांनी लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, राजकीय श्रेयवादाच्या लढाईत हे संकट काही सुटलेच नाही. दुसरे याबाबत कोणतेही सोयरसुतक नसलेल्या खारभूमी सर्व्हेक्षण व अन्वेक्षण विभागाकडून शेतकर्यांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.
यावर्षी सुध्दा शेतकर्यांनी मोठया मेहनतीने शेती केली आहे. आर्थिक काटकसर करून कुटुंब चालविताना पीक उभे केले. आता भात कापून अडगवणी झाली, दोन दिवसात पीक घरी नेण्याची तयारी सुरू होती. त्यातच पिकावर पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण भात पाण्यात गेला आता काय करणार असा सवाल या शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. समुद्राच्या भरतीचे पाण्यानी नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
सद्या असणारे लाकडी दरवाजे टिकाव धरत नाही. त्यामुळे नवीन प्रस्ताव देण्यात आला असून तो मंजूर झाला आहे. यावेळी लवकरच फायबर दरवाजे बसवविण्यात येतील.
स्वप्नील पिसे, उपविभागीय अभियंता
खारभूमी सर्व्हेक्षण व अन्वेक्षण विभाग श्रीवर्धन