शेकडो गावांचा संपर्क तुटला
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
रायगड जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सर्वत्र अतिवृष्टी चा हाहाकार पहावयास मिळत असून पाण्याचा प्रवाह वाढल्याने मुख्य महामार्गासह अनेक गावांना जोडणार्या नदी पुलांवरून पाणी जाऊ लागलेय. डोंगर दर्याखोर्यातुन व माळरान पठारावरून आलेला वेगवान पाण्याचा प्रवाह येथील नद्यांना मिळाल्याने सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

पाली खोपोली मार्गावरील पाली अंबा नदी पुलावरुन पाणी गेल्याने दोन्ही बाजुची वाहतूक तासनतास खोळंबली. नवीन पुलाचे काम अपूर्ण असल्याने नागरिक , प्रवाशी विद्यार्थी यांना पुन्हा एकदा या त्रासाला सामोरे जावे लागले. सुधागड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा व रहदारी व वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या भेरव पुलावरून देखील जोरदार पाणी वाहू लागले तसेच सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सभोवतालच्या गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खालापूर तालुक्यातील खोपोली – पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणार्या रस्त्यावरील अंबा नदीवर असणार्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तुकसई व भेरव पुलालगत व सभोवताली अनेक गावे व आदीवासी वाड्या असल्याने येथील नागरिकांशी संपर्क तुटला असल्याचे समोर आलेय.

भेरव गावच्या जवळपास वाघोशी, कवेळे, आवंढे, महागाव, चंदरगाव, हातोंड, पडसरे, तसेच भोप्याची वाडी, चंदर गाव बौद्धवाडी, महागाव बौद्धवाडी, आसरे, उद्धर आदींसह गावे व आदिवासी वाड्याना जोडणार्या भेरव पुलावर पाणी असल्याने या गावांचा संपर्क तुटल्याचे दिसून आले. तसेच विजबत्ती गुल झाल्याने अडचणीत अधिक वाढ़ झाली.

भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगडसह कोकणाला अतिवृष्टी चा इशारा दिला असून त्यानुसार मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. दरडग्रस्त व नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित स्थळी हलविले आहे. तसेच नदी पुलांच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अतिवृष्टी काळात खबरदारी घ्यावी, धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, कामाशिवाय बाहेर पडू नये, कोणतीही आपत्ती जाणवल्यास तात्काळ स्थानिक व तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा.
– दिलीप रायन्नावार, तहसीलदार सुधागड