। पनवेल । वार्ताहर ।
गेल्या 24 तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले असून अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच वाहतूककोंडी झाल्याचेही पहायला मिळाले.
पनवेल, नवी मुंबई परिसरात गेल्या 24 तासापासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गाढेश्वर धरणसुद्धा तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गाढी नदीने सध्यातरी इशारा पातळी ओलांडली नाही. मात्र असाच पाऊस पडत राहिल्यास पातळी ओलांडू शकत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अनेक नदी व नाले परिसरातून पाणी वेगाने वाहत असल्याने महानगरपालिका व शासकीय यंत्रणा घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. परिसरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा, अग्निशमक दल व आपत्कालीन पथक सज्ज आहे. या पावसाचा फटका चाकरमान्यांना पडला असून एस.टी, एनएमएमटीच्या बसेस वाहतूक कोंडीमुळे धीम्या गतीने होत आहे.
दरम्यान कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. अरबी समुद्रापासून मध्य आणि पूर्व भारताच्या दिशेने वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.