। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पालक सभा उत्साहात पार पडली. 11 वी मध्ये प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेतील जीवन अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार, शिक्षा देण्याचे काम पालक व शिक्षकांचे असते. या अनुषंगाने पालक सभेत विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सोडविण्याचा पुर्णपणे प्रयत्न करता याव या उद्देशाने आज पीएनपी संकुल वेश्वी सभागृहात पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य मिर्जी यांनी पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण, कला, क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वगुण संपन्न विद्यालय म्हणजे फक्त पीएनपी. 100 टक्के मुलांचे भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था म्हणून पीएनपीचे नावलौकिक आहे. विद्यार्थ्यानी करियर निवडताना तुमची आवड कशात आहे ते पहिल्यांदा निवडा तरचं ध्येयापर्यंत पोहचता येईल आणि ध्येय साध्य करता येईल असे सांगितले. कॉलेजच्या अभ्यासा सोबत सीईटी / स्पर्धा परीक्षेची तयारी असणे गरजेचे आहे. विद्यार्थी त्याच्या अनुभवानुसार उत्तम गुण संपादन करतो आणि यशस्वी होतो. फक्त स्वप्न बघू नका तर पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि चिकाटी ठेवा असा मोलाचा सल्ला देवून पालकांशी हितगुज साधले. तसेच प्राध्यापकांची तोंड ओळख आणि ते घेत असलेले विषय याबाबत माहिती देण्यात आली.
शिक्षणाला जोड व्यावसायिक प्रशिक्षणाची आता सापडेल गुरुकिल्ली स्वावलंबनाची या मथळ्याखाली पीएनपी संकुलात शालेय व महाविद्यालयीन शिक्षणसोबत कौशल्यविकास अंतर्गत बेसिक कॉम्प्युटर कोर्स, शिवणकला – फॅशन डिझायनिंग, व्यक्तिमत्व विकास व इंग्रजी संभाषण आदि मोफत कोर्स दिले जाणार आहेत अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. या प्रसंगी प्रा. निशिकांत कोळसे-पाटील, प्रा. सद्दाफ शहाबाजकर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील यांनी तर आभार प्रा. आशिष पाटील यांनी मानले.