| उरण | वार्ताहर |
मोरा- भाऊचा धक्का सागरी प्रवासासाठी आता जादा 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 26 मेपासून पावसाळी हंगामासाठी या मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दर 80 रुपयांवरून 105 रुपयांपर्यंत महागणार आहे. नोकरी, व्यवसाय तसेच मुंबई, रायगडात पर्यटनासाठी येणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात भरमसाट वाढ केली जाते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 80 रुपयांवरून थेट 105 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफ तिकीट दरातही लाक्षणिक म्हणजे 39 रुपयांवरून 52.50 रुपयांपर्यंत म्हणजे 13.50 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. ही पावसाळी हंगामासाठी तिकीट दरवाढ 26 मेपासूनच 31 ऑगस्टपर्यंत लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. पावसाळी हंगामासाठी या तिकीट दरवाढीची मंजुरी मेरिटाईम बोर्डाकडून याआधीच घेण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली.
दरवाढीनंतरही समस्या मात्र कायम
भाऊचा धक्का हा प्रवास फायदेशीर, सुखद आणि शॉर्टकट म्हणून ओळखला जातो. वाहतूककोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते. मांडवा-अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा - भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. मात्र, तिकीट दरवाढीनंतरही सुविधांमध्ये कोणतीही वाढ होत नाही. उलट प्रवाशांना गळक्या प्रवासी बोटींसह इतर समस्यांचा सामना करावा लागतो.