आळंदीला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिकअपची धडक

चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

। खालापूर । वार्ताहर ।
जुना पुणे मुंबई महामार्गावर कार्तिकी एकादशीला आळंदीकडे खालापूरच्या उंबर गावातील वारकऱ्यांच्या पायी दिंडीला कान्हे फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडी सोहळ्यात पिकअप गाडी घुसल्याने दिंडीतील सुमारे 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले असून, चार जणांचा मृत्य झाला आहे.

सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड, जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड. विमल सुरेश चोरघे (वय ५०) रा. बिड खुर्द ता. खालापूर. संगीत वसंत शिंदे (वय ५६) रा. कर्जत जि. रायगड अशी मयतांची नावे आहेत. उंबरे, ता.खालापूर, जि. रायगड येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील हे वारकरी होते. मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेला वारकरी मार्गस्थ होत असताना कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी पायी दिंडीच्या मधोमध घुसली. त्यामुळे दिंडीत एकच कल्लोळ झाला, तर जखमी रस्त्यावर विव्हळत होते. या अपघातात दिंडीत सुमारे 200 वारकरी असल्याची माहिती वडगांव मावळ पोलिसांनी दिली.

Exit mobile version