आ. जयंत पाटील यांच्या मागणीची दखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पेडली येथील पूल जीर्ण झाल्याची कबुली देत त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.
1989 च्या महापुरानंतर पेडली येथे पूल बांधण्यात आला होता. आसरे, नवघर, कासारवाडी, धोंडीवली, कोडगांव, ठाणाळे, पुरातन वीरेश्वर मंदिर, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील या पुलावरून ये – जा करतात. मात्र याची दुरुस्ती न केल्याने या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुलाच्या बांधणीला विलंब का होत आहे, असा सवाल आ. जयंत पाटील यांनी सभागृहाला विचारत, तात्काळ पूल नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी केली. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हणाले की, हा पूल जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. तो क्षतिग्रस्त झाला आहे, असे त्यांनी कबूल केले. पुढे त्यांनी सांगितले. या पुलाच्या पुनर्बाधणीचे काम केले जाणार आहे. प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. निधी वितरीत करण्यात आला आहे, त्याचे काम लवकरच होईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.