परकर दाम्पत्याचे यशस्वी आर्थिक स्वावलंबन
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मंडणगड तालुक्यातील वेळास गावातील सुहास व शिल्पा परकर या दाम्पत्याने मिश्र भाजीपाला लागवडीतून आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले आहे. आपल्या राजीवडा कालूसीचा टेप या ठिकाणी अकरा गुंठे जागेवर पंधरा वर्षांपासून बारमाही भाजीपाला लागवडी यशस्वीपणे ते करत आहेत.
दैनंदिन जीवनात लागणारी मेथी, मुळा, कोथिंबीर, माट असा विविध भाजीपाला वयाच्या साठीत पोहोचलेले परकर दाम्पत्य करीत आहेत. शेताच्या जवळून वाहणारे ओढ्याचे नैसर्गिक पाणी, झरे याचा योग्य वापर त्यांनी केला आहे. शेताला रानटी वनस्पती, झाडे यांचा वापर करून कुंपण उभारले आहे.
भाजीपाला हा जलद गतीने वाढत असल्याने महिन्यातून दोनदा पिकाचे उत्पादन घेत असून परिसरातील बाणकोट, वेसवी, वेळास गावांतून तो विक्री केला जातो आहे. कमी वेळात भाजीपालामधून उत्पन्न येत असल्याने चलन रोजच्या रोज चालू राहते. अडीच किलो मेथी पेरून त्यातून 400 जुड्या काढल्या जात असल्याचे परकार यांनी सांगितले.
नुकताच कोथिंबीर, मेथी, मुळा यांची काढणी झाली असून, आता त्यांनी घेवडीची नवीन लागवड केली आहे. वेळास हे मंडणगड तालुक्याचे शेवटचे टोक असून कृषी विभागाच्या योजना पोहचण्यास विलंब होतो तसेच कृषी विभागाचे मार्गदर्शन कमी पडते असल्याचे त्यांनी सांगितले
. एवढ्या वर्षात अधिकार्यांपैकी प्रथमच कृषी अधिकारी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनिकर व पवन गोसावी यांनी आपल्या शेतात भेट देत मार्गदर्शन दिल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. रोगांवर गावठी औषधांचा वापर करीत आहेत.
- भातशेतीवर वर्षभर मेहनत करूनही पदरात उत्पन्न पडेल याची खात्री नसते तसेच त्याला वर्षभर मेहनत घ्यावी लागत असल्याने जलद उत्पन्न देणार्या मिश्र भाजीपाला लागवडीकडे वळलो आणि त्यात यश मिळाले. – सुहास परकर, शेतकरी, वेळास-मंडणगड