1 लाख 73,541 शेतकर्यांना लाभ
अलिवाग । वर्षा मेहता ।
पीएम किसान योजेनेंतर्गत देण्यात येणार्या अनुदानाची रायगड जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. जिल्ह्यात 2019 मध्ये 1 लाख 48 हजार 443 शेतकर्यांना योजेनेंंतर्गत 2 हजार रुपयांचा पहिला टप्पा देण्यात आला होता. त्यापैकी 4 हजार 446 शेतकर्यांना अद्यापही दुसरा तर 18 हजार 646 शेतकर्यांना तिसरा टप्पा मिळालेला नाही. तसेच 2020 मध्ये 1 लाख 19 हजार 965 शेतकर्यांना पहिला हप्ता देण्यात आला. त्यापैकी 6 हजार 979 शेतकर्यांना दुसरा तर 13 हजार 573 शेतकर्यांना तिसरा तसेच 2021 मध्ये 94 हजार 912 शेतकर्यांना पहिला टप्पा तर 35 हजार शेतकरी अद्यापही दुसर्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांची माहिती बघता 78 हजार 973 शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2 हजार रुपयांचे तीन हप्ते जाहीर केले. पण आधार कार्ड आणि पंतप्रधान सन्मान योजनेच्या साइटवरील माहितीमध्ये तफावत असल्यास शेतकर्यांना निधीसाठी वाट पाहावी लागत आहे. कारण, 2019-20 वर्षापासून हप्त्याची रक्कम आधारबेस माहितीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असं सरकारनं स्पष्ट केले होते. 2018-19 मध्ये मात्र संबंधित शेतकर्याकडे आधार कार्ड नसेल, तर त्यांच्याकडून पर्यायी ओळखपत्र घेण्यात येतं होतं.
केंद्र आणि राज्य शासन हे बळीराज्याला पाठबळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक योजना राबवित आहेत. नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सुमारे 9.75 कोटी लाभार्थी शेतकर्यांना सुमारे 19,500 कोटी रुपये हस्तांतरित केले. हा या योजनेचा नववा हप्ता होता.
नवव्या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने योजनेअंतर्गत सुमारे 11 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 1.37 लाख कोटी रुपये वितरित केले होते. परंतु ही योजना सुरु केल्यावर त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे जिल्ह्यातील 78 हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ही योजनेची सुरुवात चांगली झाली; मात्र आकडेवारी पाहता या टक्केवारीत सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री