धार्मिक स्थळे बंदच; सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई | प्रतिनिधी |
राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे . त्यानुसार आता 15 ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.
विवाह सोहळ्यात 200 वर्हाडी
उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याल जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.
जी खासगी कार्यालयं आहेत, त्या ठिकाणी 24 तास खासगी कार्यालयं सुरू राहू शकतील, गरजे प्रमाणे एका सत्रात 25 टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालयं सुरू ठेवता येतील, अशी सूचना करण्यात आलेली आहे. सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. त्याचबरोबर सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे. इनडोअर स्पोर्ट्समधील खेळाडू व तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले असतील तर, जे काही इनडोअर स्पोर्ट्स आहे त्यामध्ये मग बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी सर्व खेळांना परवानगी दिली गेली आहे.