विविध भागात जवळपास दहा तास बत्ती गुल
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
कळंबोलीतील विविध सेक्टरमध्ये वारंवार होणाऱ्या केबल फॉल्टमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बिघाडामुळे सेक्टर 14 आणि सेक्टर 5 ई मधील तब्बल दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना उकाड्यात रात्र जागून काढावी लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 14 येथील दत्त मंदिराजवळील सुमारे 100 मीटर अंतराच्या भूमिगत केबल लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात जॉईंट देण्यात आले आहेत. याच भागात वारंवार केबल जळणे, तुटणे व फॉल्ट होण्याच्या घटना घडत असल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना तासन्तास अंधारात राहावे लागत आहे.
कळंबोलीतील विविध भागांमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामे तसेच सेक्टर 14 व 15 परिसरात वेगाने सुरू असलेले बांधकाम यामुळे भूमिगत विजेच्या वाहिन्यांचे नुकसान होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे वीजभार वाढत असताना विद्यमान यंत्रणा अपुरी पडत असल्याने केबल फॉल्टचे प्रमाण वाढल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
शुक्रवारी दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात आल्यानंतर मध्यरात्री पुन्हा केबल फॉल्ट झाला. त्यानंतर रात्रभर दुरुस्तीचे काम सुरू राहिले. अखेर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, उष्णतेमुळे अनेक नागरिकांनी रात्रभर घराबाहेर, इमारतींच्या आवारात आणि रस्त्यांवर बसून वेळ काढला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना याचा मोठा फटका बसला.
गृहनिर्माण सोसायटी ओनर्स असोसिएशनने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच दोषपूर्ण केबल बदलून नवीन केबल व ट्रान्सफॉर्मर बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी गाठले महावितरण कार्यालय
कळंबोली येथील महावितरण कार्यालयात कॉल उचलण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वीज खंडित झाल्याने अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठत कार्यालयात ठिय्या मांडला होता.
