आंब्यांच्या दरांत घसरण सुरू

कोकणातील आंब्यांची आवक वाढली

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.

यावर्षी लहरी हवामानाचा फटका बसल्याने, सर्वच ठिकाणांच्या आंब्याला मोठा फटका बसला होता. त्यामुळे बाजारात आंबा तुलनेने कमीच होता. त्यातही कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन 17 ते 18 टक्क्‌‍यांवर आले. या आंब्याचे दर एक हजार रुपये डझनच्या घरात गेले होते. हापूस कमी प्रमाणात असल्याने, त्याला पर्याय म्हणून हापूससारख्या दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्यांकडे ग्राहकांनी मोर्चा वळवला होता. त्याचपाठोपाठ इतर जातींच्या म्हणजेच बदामी, केसर, लालबाग, तोतापुरी या आंब्यांकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे या आंब्यांच्या दरातही वाढ झाली होती. म्हणूनच एप्रिल आणि मे महिन्याची सुरुवात या आंब्याच्या मुख्य हंगामाच्या काळातही आंबा खरेदी करण्यास ग्राहक फारसे उत्सुक नव्हते.

आता 10 मेपासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. हापूस आंब्यांपाठोपाठ कर्नाटकी आंबे, दक्षिण भारतातून बदामी, लालबाग, तोतापुरी आंबे येत आहेत. गुजरातवरून केसर आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. या सर्वांचे दर नियंत्रणात आले आहेत. हा आंब्यांचा मुख्य हंगाम असून त्याला मागणी चांगली आहे.

आंबाआत्ताचे दरपूर्वीचे दर
हापूस500 ते 1000 रु. डझन1000 ते 1200 रु. डझन
कर्नाटक50 रु ते 100 रु.80 ते 150 रु. किलो
बदामी30 ते 80 रु. किलो70 ते 120 रु. किलो
लालबाग30 ते 50 रु. किलो50 ते 100 रु. किलो
केसर50 ते 100 रु. किलो80 ते 120 रु. किलो
तोतापुरी30 ते 60 रु. किलो50 ते 70 रु. किलो
Exit mobile version