परवानगीशिवाय सुरू असलेले काम थांबविण्याची मागणी
| वावोशी | प्रतिनिधी |
हेटवणे जलबोगदा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी पेणमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. तालुक्याच्या अस्तित्वाशी निगडित ‘पाणी वाचवा प्रदूषण रोखा’ या लढ्यामुळे आंदोलनाला प्रचंड तीव्रता लाभली आहे.
यावेळी हेटवणे धरणातून मुंबईकडे पाणी वळवण्यासाठी सुरू असलेल्या 3.2 मीटर व्यासाच्या जलबोगद्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी ठामपणे मागणी केली की, परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले पाहिजे. तालुक्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा बोगदा कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही, असा शासनावर निष्क्रीयतेचा आरोप ठेवत कार्यकत्यांकडून सांगण्यात आले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झेमसे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत सवाल केला की, परवानगीशिवाय एवढे भलेमोठे जलबोगद्याचे काम सुरुच कसे होते? हक्काचे पाणी पळवले जात असताना प्रतिनिधी एवढे गप्प का बसलेत? या आंदोलनात विविध संघटनांचा मोठा सहभाग होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे, छावा संघटनेचे जितेंद्र ठाकूर, ‘माझं पेण’चे राजू पाटील, एमएमआरडीए विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष महेंद्र ठाकूर, संजय थळे, सुनिल धामणकर, गोरख पाटील, सामाजिक कार्यकर्त्या समिधा पाटील, तुषार पाटील, राजू पाटील, मनिषा थवई, शामकांत म्हात्रे, जयसन पाटील, चंदू म्हात्रे, लिलाधर म्हात्रे, किरण म्हात्रे, गणेश तांडेल, प्रभाकर पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. याशिवाय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आकाश पाटील, प्रकाश माळी, सी.आर. म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, प्रितेष माळी व योगेश मढवी आदी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.
दरम्यान, हेटवणे धरणाचा जलसाठा कमी झाल्यास खारेपाटातील सुपीक शेती व पिण्याच्या पाण्यावर गंभीर प्रश्न निर्माण होईल, असा ठाम इशारा देत आंदोलनकर्त्यांनी जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले. जलबोगद्याविरोधात पेण तालुका अक्षरशः जनआक्रोशाने दणाणून गेला असून, पुढील काळात ही चळवळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा जलबोगदा कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले पाहिजे.
नंदाताई म्हात्रे,
सामाजिक कार्यकर्त्या
आपल्या डोळ्यांसमोर हक्काचे पाणी पळवण्यासाठी जलबोगद्याचे काम होत आहे. मग प्रशासन व निवडून आलेले प्रतिनिधी एवढे गप्प का बसलेत?
राजेंद्र झेमसे,
सामाजिक कार्यकर्ते
