| चिपळूण | प्रतिनिधी |
जुलै महिना मानव तस्करीविरोधी जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. अनेक महिला व मुली फसवणूक, प्रेमाचे आमिष, लग्नाचे आमिष किंवा नोकरीचे आश्वासन यामुळे वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. त्यांच्यामागे बहुतेकवेळा एक संघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत असते. ही पीडित महिलांनी अनेकदा यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तरी समाजाकडून आधाराऐवजी अपमान, अवहेलना आणि दुर्लक्षच मिळते. अशा महिला छळ, आजारपण आणि अपमानास्पद आयुष्य जगण्यास भाग पडतात. कोकणातील काही भागांमध्येही अशा घटनांमध्ये वाढ होत असून, हा प्रकार आता गंभीर सामाजिक संकट बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ‘अन्याय रहित जिंदगी’ या गोव्यातील सामाजिक संस्थेच्यावतीने व मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या सहकार्याने एक विशेष जनजागृती शिबीर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर 29 जुलै रोजी सकाळी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय सभागृहात होणार आहे. अधिक माहितीसाठी सजग स्वास्थ्य क्लिनिक चिपळूनच्या डॉ. श्रुतिका कोटकुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







