मुलींच्या गटात नाशिकच्या प्रचिती चंद्रात्रेयला विजेतेपद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आयोजित राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या व निर्णायक फेरी अखेर साडेआठ गुण मिळवत साहिल शेजळ या पुण्याच्या खेळाडूने निर्विवाद पणे विजेतेपदावर नाव कोरले तर मुलींच्या गटात नाशिकची सुवर्ण कन्या प्रचिती चंद्रात्रेय ने आपला दबदबा कायम राखत अजिंक्यपद खिशात घातले.
मुलांच्या गटात 143 खेळाडू तर मुलींच्या गटात 51 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, त्यापैकी 116 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा सहभागच स्पर्धेची काठिण्य पातळी दर्शवतो, अतिशय मानाच्या मानल्या जाणार्या या विजेतेपदाच्या शर्यतीत अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची चुरस या लढतींमध्ये अनुभवायला मिळाली. महाराष्ट्राचा गुणी खेळाडू व कँडिडेट मास्टर ओम कदम याला मुलांच्या गटात फक्त अर्ध्या गुणांच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर मुलींच्या गटात प्रचिती व धनश्री खैरमोडेचे गुण एकसमान असल्याकारणाने त्यांनाही टाईब्रेकर चे आंतरराष्ट्रीय निकष लावत प्रचिती ला विजेतेपद तर धनश्रीला उप विजेतेपद देण्यात आले.
दोन्ही गटांतील प्रथम दोन विजेते खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आले असून अठरा वर्षांखालील वयोगटासाठी ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. त्याच बरोबर मुलांच्या व मुलींच्या राज्य निवड स्पर्धा गटातील प्रथम 15 खेळाडूंना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले व पंचांची भूमिका पार पाडणार्या सर्वांचे मनापासून आभार मानले.