यंदाही मुलींचीच बाजी, निकाल 94.66 टक्के
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि.5) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. मुंबई विभागीय मंडळाचा 93.93 टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागातून रायगड विभागाचा सर्वाधिक निकाल 94.66 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलांना मागे टाकत चार टक्क्यांनी अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत 96.49 टक्के मुली व 92.91 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात परीक्षा संपल्यावर निकालाची प्रतीक्षा लागून राहिली होती. परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली. सोमवारी दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. काही विद्यार्थ्यांनी मोबाईलवरून तर काहींनी सायबर कॅफेमध्ये जाऊन बारावीचा निकाल पाहिला. काही सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. उत्तीर्ण झाल्यावर अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत 29 हजार 493 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 27 हजार 848 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यामध्ये त्यात 13 हजार 917 मुली व 13 हजार 931 मुलांचा समावेश आहे. जिल्ह्याचा निकाल 94.66 टक्के लागला आहे. त्यात मुले 92.91 टक्के व मुली 96.49 टक्के उतीर्ण झाले. यंदादेखील मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल 99.48 टक्के तळा तालुक्याचा लागला आहे. सर्वात कमी 84.09 टक्के निकाल श्रीवर्धन तालुक्याचा लागला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 94.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी 94.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुलनेने निकालच्या आकडेवारीत आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेने 0.17 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे.
जे विद्यार्थी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करावा व पुढील परीक्षेत यश संपादित करावे. बारावीनंतर करिअरच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या दृष्टीने पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी.
नेहा भोसले,
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
विज्ञान शाखा | |||
नोंदणी झालेले विद्यार्थी | प्रविष्ट | उत्तीर्ण झालेले विद्यार्थी | टक्केवारी |
13092 | 13074 | 12887 | 98.56 |
कला शाखा | |||
5507 | 5469 | 4592 | 83.96 |
वाणिज्य शाखा | |||
10351 | 10338 | 9890 | 95.66 |
जिल्हानिहाय निकाल
रायगड : 94.66 टक्के,
ठाणे : 93.74 टक्के,
पालघर : 92.19 टक्के,
बृहमुंबई : 90.67 टक्के,
मुंबई उपनगर : 1 93.18 टक्के,
मुंबई उपनगर : 2 92.27 टक्के
73.19 टक्के पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील दोन हजार 457 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील 2 हजार 432 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक हजार 780 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 73.19 टक्के इतके आहे.
जिल्ह्यातील निकालावर दृष्टीक्षेप
तालुका | मुले | मुली | टक्केवारी |
पनवेल | 95.10 | 97.02 | 96.03 |
उरण | 92.37 | 95.28 | 93.85 |
कर्जत | 95.02 | 97.67 | 96.38 |
खालापूर | 87.89 | 93.49 | 90.48 |
सुधागड | 82.27 | 89.37 | 85.33 |
पेण | 89.88 | 96.14 | 92.99 |
अलिबाग | 94.10 | 96.95 | 95.56 |
मुरूड | 85.90 | 95.31 | 90.69 |
रोहा | 93.71 | 96.97 | 95.29 |
माणगाव | 93.61 | 98.75 | 96.06 |
तळा | 99.06 | 100 | 99.48 |
श्रीवर्धन | 78.04 | 90.06 | 84.09 |
म्हसळा | 95.72 | 97.62 | 96.62 |
महाड | 94.15 | 98.05 | 96.14 |
पोलादपूर | 84.16 | 96.31 | 91.16 |
एकूण | 92.91 | 96.49 | 94.66 |