महाडमध्ये एनडीआरएफच्या चार तुकडय़ा तैनात
कोकणात सज्जतेचे आदेश,ऑरेंज अलर्ट जारी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह राज्यात आजपासून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील सर्व जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. कोकणात 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्यातील जगबुडी व कोदवली नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. मुंबईत कांजुरमार्ग, घाटकोपर तसेच रायगड व महाडमध्ये एनडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा चार तुकडय़ा तैनात केल्या आहेत. जून ते जुलै महिन्यात नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत राज्यात 67 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केंद्रीय हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱयानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात सज्जतेचे आदेश दिले आहेत. 12 जुलैपर्यंत धोक्याचा इशारा दिला आहे. या इशाऱयानंतर मुंबईत एनडीआरएफच्या पाच, ठाणे, रायगड, रत्नागिरी व कोल्हापुरात दोन तर पालघर व सिंधुदुर्गात एनडीआरएफची एक टीम तैनात केली आहे.
नदीकाठच्या रहिवाशांचे स्थलांतर
रायगड जिह्यातील दरडप्रवण व पूरप्रवण भागातल्या घरांमधील 3 हजार 641 रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे, तर रत्नागिरीतील दरडप्रवण व पूरप्रवण भागातील 965 रहिवाशांचे स्थलांतर केले आहे.
या जिह्यांमध्ये अति ते अतिमुसळधार
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा कोकणातील सर्व जिह्यांमध्ये किमान 64 ते कमाल 200 मिमी पावसाचा इशारा केंद्रीय हवामान विभागाने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला आहे.