‘रंगोत्सव 2026’ ला नागरिकांचा प्रतिसाद; योशिता आर्टचा स्तुत्य उपक्रम
| उरण | प्रतिनिधी |
बालकांच्या हातातील मोबाईलचे व्यसन सोडवून त्यांच्यातील सुप्त गुणांना कॅनव्हासवर आणण्याच्या उद्देशाने ‘रंगोत्सव 2026’ (बॅच 2) हे भव्य चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाची सांगता व पुरस्कार सोहळा उरण येथील जेएनपीए स्टाफ क्लब येथे उत्साहात पार पडला. योशिता आर्ट क्लासेस आणि मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या या ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटिंग प्रदर्शनाने उरणमधील कलाप्रेमींची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कलेची आराध्य देवता नटराज मूर्तीचे पूजन, पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून या देखण्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आजच्या पिढीच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “आजची लहान मुले मोबाईलच्या आभासी दुनियेत इतकी गुंतली आहेत की, पालकांचे ऐकणेही त्यांनी बंद केले आहे. या मानसिकतेमुळे मुले नैराश्य आणि चिडचिडेपणाकडे झुकत आहेत. त्यांना यातून बाहेर काढून जगाकडे सुंदर नजरेने पाहण्याचा कलात्मक दृष्टिकोन देणे हाच या 7 दिवसीय सेमिनारचा मुख्य हेतू होता. मुलांनी कोऱ्या कॅनव्हासवर उमटवलेले सुंदर रंग ही त्यांच्या कल्पकतेची आणि एकाग्रतेची पावती आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, चित्रकला क्षेत्रात नॅशनल लेव्हल (राष्ट्रीय पातळीवर) यश संपादन करून उरणचा डंका संपूर्ण देशात पिटणाऱ्या तीन बालकलाकारांचा झालेला विशेष सत्कार करण्यात आला. यात साक्षी गणेश ठाकूर, भार्गवी रुपेश म्हात्रे, स्वरा रामानंद जाधव या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह आणि योशिता मिलिंद ठाकूर हिने स्वतः हाताने तयार केलेले सुंदर गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यासोबतच, या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. कार्यक्रमाला उरण परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
आजच्या पिढीला मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर चित्र, शिल्प, संगीत किंवा अभिनय अशा कोणत्याही कलेशी त्यांची नाळ जोडून द्या. या रंगोत्सवाची समाजाला नितांत गरज आहे.
प्रियंवदा तांबोटकर, महिला अध्यक्षा, म.रा. कला अध्यापक संघ
मुलांनी रेखाटलेले प्रत्येक चित्र त्यांच्या अंतर्मनाचा आणि स्वभावाचा आरसा असतो. अशा प्रकारची प्रदर्शने मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत.
– रमाकांत गावंड, शिक्षक नेते व मुख्याध्यापक
