मुखवट्यांना जिल्ह्यातून मोठी मागणी
| उरण | वार्ताहर |
नवरात्रोत्सवात घरोघरी घट स्थापना केली जाते त्यासाठी नारळाच्या शाहळ्यांचे मुखवटे बनवून त्याची पूजा करण्याची परंपरा ही आहे. त्यासाठी उरणच्या नागाव मध्ये गजानन नाईक हे वयाच्या 80 व्या वर्षी आपल्या कलेच्या साधनेतून हे मुखवटे मागील 60 वर्षांपासून तयार करीत आहेत. त्याचा कोणताही मोबदला ते मागत नाहीत. देवीचे भक्त जे देतील ते स्वीकारून ही सेवा ते अविरत करीत आहेत. या मुखवट्याना जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून मागणी आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/10/devi-1-1024x563.jpg)
दरवर्षी 35 पेक्षा अधिक मुखवटे बनविले जातात. यासाठी झाडावरील अर्धे कच्चे नारळ काढून ते व्यवस्थित सोलून त्याला मखवट्याचा आकार दिला जातो. त्यानंतर आक्रयलिक रंगाने रंगवून मुखवटा तयार केला जातो. त्यानंतर त्याची मखरात सजावट करून दागदागिने घालून देवीची नऊ दिवसांसाठी प्रतिष्ठापना केली जाते. मुखवट्याचे काम हे व्यवसाय म्हणून नव्हे तर कलेची जपवणूक करण्यासाठी करीत असल्याची माहिती कलाकार गजानन नाईक यांनी दिली. विद्यार्थी दशेतच घरातील देवीसाठी मुखवटा बनवून याची साठ वर्षांपूर्वी सुरवात केली. तसेच यासाठी दहा दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते. त्याचप्रमाणे सध्या अनेकजण चांदीच्या मुखवट्याना रंग देण्याचं काम केलं जातं. यावर कोविड काळाचा परिणाम झाला आहे. या वारशाची जपवणूक होण्याची गरज आहे.