। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खत आणि रासायनिक उद्योग प्रवर्गातील प्रमुख कंपनी असलेल्या आरसीएफ प्रकल्पाला 2021-22 या आर्थिक वर्षात 915 कोटी 14 लाख इतर करपूर्व नफा मिळाला आहे. तर, कंपनीची वार्षिक उलाढाल 12 हजार 948 कोटींवर पोहोचली आहे. जी कंपनीच्या स्थापनेपासून आजवरची सर्वाधिक आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन आणि प्रशासन विभाग एस.एम. कुलकर्णी यांनी दिली.
कोव्हिड काळात आव्हानात्मक परिस्थितीत कंपनीने ही कामगिरी केली आहे. आरसीएफच्या भविष्यकालीन योजना आणि प्रगतीसाठी नियमितपणे कार्यक्षमतेत सुधारणा करणे, उत्सर्जन कमी करणे व खर्चात बचत करून संयंत्रांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी अद्ययावतीकरण आणि विस्तार प्रकल्प विचाराधीन आहेत. ज्यामधे थळ येथे एनपीके/डीएपी खतांच्या प्रकारांचा नवीन प्रकल्प उभारणीचा संकल्प असून, तो सरकारी प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेंतर्गत आहे.
आरसीएफ आपल्या दोन्ही उत्पादन युनिटमध्ये आयएसओ मानांकनांतर्गत येणार्या सर्व व्यवस्थापन प्रणाली (आयएमएस) चा अवलंब करीत आहे. कंपनीला विविध श्रेणींमध्ये प्रामुख्याने ऊर्जा संवर्धन, पर्यावरण, सुरक्षा, आरोग्य तसेच उत्पादनवाढीसाठी सरकारी तसेच इतर नामांकित संस्थांकडून गौरविण्यात आले असून, अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळालेले आहेत. कंपनी व्यवस्थापन आपल्या कारखान्याच्या परिसरात स्वच्छ पर्यावरण व सुरक्षितता राखण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असून, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, सौर ऊर्जेवर आधारित शाश्वत वीज वितरण इ. विकास उपक्रम हाती घेतले आहेत.
निगमित सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत (सीएसआर) कंपनीने गरजूंना सेवा देण्याच्या उद्देशाने अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवलेले आहेत. गतवर्षी कंपनीने सीएसआर उपक्रमांवर केलेल्या एकूण खर्चापैकी सुमारे 70 टक्क्यांहून जास्त निधी थळ कारखाना परिसरातील विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरलेला आहे. यात जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग व जिल्हा परिषद-रायगड अंतर्गत 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला ऑक्सिजन प्लांटसाठी अर्थसहाय्य, आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविणे, परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ग्रामीण विकासंतर्गत प्रकल्प इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.
कंपनी मूल्यवृद्धीसाठी आणि दीर्घकालीन वाढीसोबत व्यापक देशहित व आसपासच्या परिसरचा विकास व्हावा या भावनेतून निष्पक्षता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूलभूत तत्त्वांवर आधारित उच्च दर्जाचे प्रशासन राखण्याचा सतत प्रयत्न करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.