आरडीसीसीची 6000 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

जून तिमाहीत पूर्ण केला 5750 कोटींचा टप्पा

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या सांपत्तिक स्थितीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे. जून 2024 अखेर बँकेने 5750 कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून, बँक लवकरच 6000 कोटींचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्‍वास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी व्यक्त केला.

सातत्यपूर्ण कामगिरी, सहकारातील प्रभावी धोरण आणि तंत्रज्ञान स्नेही म्हणून बँकेने वेळोवेळी केलेले बदल यामुळे बँकेने हा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील उच्चपद्स्थ अधिकारी तसेच नाबार्डने बँकेच्या या कामगिरीचे कौतुक केलेले असून, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण, बँकेच्या सेवांमध्ये सातत्याने आधुनिकीकरण आणि त्यांच्यासमवेत सांपत्तिक स्थितीमधील भरीव कामगिरी, संचालक मंडळाचे उपयुक्त मार्गदर्शन आणि प्रभावी व्यवस्थापन याबद्दल बँकेचे अभिनंदन केले आहे. बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनी बँकेवरती दाखविलेला विश्‍वास आणि बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ हे एकमताने बँकेच्या उन्नतीसाठी काम करीत असल्याने हा प्रगतीचा आलेख उंचावण्यास मदत होत आहे, याबद्दल आभार व्यक्त केले.

बँकेने या आर्थिक वर्षात 25000 पेक्षा अधिक नवीन ग्राहक जोडले आहेत, यूपीआय, आयएमपीएस, स्टेटमेंट ऑन ई-मेल, क्युआर कोड यासारख्या आधुनिक सेवांसोबत ग्राहकांना लघुउद्योगासाठी तात्काळ कर्जसुविधा याद्वारे बँकेने आपला विस्तार वाढविला आहे. शिवाय, बँकेने या आर्थिक वर्षात सीकेवायसीचे काम पूर्ण केलेले असून, यामुळे देशभरातील कोणत्याही बँकेत व्यवहार करण्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्राहकाला एकच ग्राहक क्रमांक उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची शून्य रकमेने हजारो खाती बँकेने सुरू केलेली असून, त्याला चांगला प्रतिसाद ग्राहकांचा लाभत आहे, त्याबद्दलदेखील बँकेच्या अध्यक्षांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्रातील शेती आणि शेती आधारित पूरक व्यवसायांना कर्जपुरवठा करीत असून, त्याच्यासमवेत व्यवसाय आणि उद्योजकांना कर्जपुरवठा करीत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे बँकेशी तत्परतेचे नाते तयार झाले आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात 73 कोटी इतका ढोबळ नफा कमविला असून, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था, जिल्ह्यातील पतपेढ्या, अर्बन बँका, या जिल्हा सहकारी बँकेशी जोडल्यामुळे सहकारातून सहकाराची वृद्धी हे आजवर बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी जपलेले धोरण आम्ही यशस्वीरित्या पुढे नेत आहोत आणि त्यामध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपत आहेत, याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी समाधान व्यक्त करत बँकेचे ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आणि 6000 कोटींच्या व्यवसाय टप्पा पूर्ण करण्यासाठी बँकेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी सिद्ध असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version