। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रंजना खुळे आणि तालुकाध्यक्ष भगवान चंचे यांची नाराजी दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. त्यामुळे त्यांनी पदांचे राजीनामे मागे घेत पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
तालुक्यातील राष्ट्रवादी महिला विभाग यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमांचे बॅनरवरून वाद रंगला आणि त्यानंतर रंजना धुळे यांनी जिल्हाध्यक्षा उमा मुंढे यांच्याकडे पदाचा राजीनामा तडकाफडकी पाठवून दिला होता. खा. सुनील तटकरे यांच्या भेटीसाठी कर्जत तालुक्यातील दोन पदाधिकारी पोहोचले. त्याची माहिती कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांना मिळाली. त्यावर चंचे यांनी त्या दोन्ही पदाधिकार्यांकडे चौकशी केली असता तटकरे यांना भेटायला गेलोच नसल्याची त्यांनी माहिती दिली. त्यामुळे तालुका अध्यक्ष यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले जाणार असतील तर त्या दोन्ही पदाधिकार्यांची तक्रार करीत भगवान चंचे यांनी पदाचा राजीनामा दिला. तालुका राष्ट्रवदी काँग्रेसमधील दोन्ही प्रमुख पदाधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ माजली होती.
आगामी काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हे दोन्ही धक्के होते. ते लक्षात घेऊन राजीनामा देणारे दोन्ही पदाधिकार्यांसोबत तटकरे तसेच माजी आ. सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आणि उमा मुंढे यांनी चर्चा केली. आगामी काळात मतभेद होणार नाहीत, अशी सूचना सुनील तटकरे यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या पदाधिकार्यांना केली आहे. त्यानुसार चंचे आणि रंजना धुळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्या दोन्ही तालुकाध्यक्षांनी पुन्हा पक्षात सक्रिय होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.हा समेट घडत असताना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.