| नागपूर | दिलीप जाधव |
सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे. हा विश्वास देण्यासाठी सीमा भागातील मराठी माणसांच्या लढ्याला संपूर्ण पाठींबा देणारा ठराव आजच सभागृहात एकमताने मंजूर करावा. अस आवाहन शेकाप आ. जयंत पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत केले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. कर्नाटकच्या विधीमंडळात सीमाभागासंदर्भातील ठराव मंजूर करताना महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, अस्मितेला धक्का लावण्याचे काम झाले असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
सरकार गप्प का
नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्ये सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही कर्नाटकच्या विधीमंडळात महाराष्ट्रविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आहे असून त्यांना सीमेवर अटक करण्यात आली. तरीही महाराष्ट्र सरकार गप्प बसले आहे. सीमाभागातील मराठी माणसांवरील कर्नाटकच्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र विधानसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. सन 1956 साली झालेली भाषावार प्रांतरचनेमुळे मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनता गेली 56 वर्ष विविध मार्गांनी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन झाली. कर्नाटक सरकारने पोलिसांच्या मदतीने अनेक खोटे गुन्हे मराठी भाषिकांवर दाखल करण्यात आले. सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना कृषी, पाणी, वीज, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य आदी संबंधीच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. मराठी भाषेत कोणतेही कागद पत्रे देत नाही. सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेला स्वतंत्र भारतात दुर्लक्षित घटकासारखे जीवन जगावे लागते, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयात सदर खटला प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी खाजगी संस्थेच्या जागेत सन 2006 पासून अधिवेशन घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्र्यांना व नेत्यांना बेळगावात येण्यास मनाई करण्यात आली आहे . काही कर्नाटक संघटनांकडून महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करुन दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे . याकड़े सरकारचे दुर्लक्ष होत असल्यामुळे सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
आ. जयंत पाटील