| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील पूर्व विभागाला सतत तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. या भागातील कौलारू घरे कोसळण्याच्या घटनांसह भात शेतीलाही मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या नैसर्गिक झऱ्यातून येणारा गाळ मोठ्या प्रमाणात भातशेतीत बसला असून, काही शेताच्या बांधांना खांडी गेल्या आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाहून येणाऱ्या गाळामुळे भात शेती धोक्यात आली आहे.
भात शेतीत मळयुक्त आलेला गाळ शेतीसाठी फायदेशीर असून, या नैसर्गिक मळयुक्त गाळामुळे भातशेती फोफावणार असल्याचे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे. याशिवाय किडीचाही प्रादुर्भाव टळणार असल्याचे शेतकरी सांगत असले तरी बऱ्याच ठिकाणी शेतात बसलेल्या गाळामुळे व बांधांना पडलेल्या खांडींमुळे भात शेतीचे नुकसान झाल्याची चर्चा या परिसरात ऐकावयास मिळत आहे. संबंधित शासनाने भातशेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.







