मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी

रेवदंडा बंदर पर्यटकांनी हाऊसफुल्ल
पापलेट, सुरमईला मोठी मागणी
| चौल | प्रतिनिधी |
दिवाळी सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळी-सकाळी रोजच रेवदंडा बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये येणारी मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

थंड अल्लाहदायक वातावरण, अलिबाग शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला आक्षी, नागाव ते रेवदंड्यापर्यंतचा समुद्र किनारा आणि नारळी-फोपळीच्या बागांची निवांत सावली यामुळे पर्यटकांकडून याठिकाणी मोठी पसंती मिळत आहे. रेवदंडा बंदर हे तालुक्याचे ताजी मासळी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील किंवा परदेशातील पर्यटक मासळी खरेदीसाठी रेवदंडा बंदरात आवर्जून येतात.

दिवाळीच्या 15 दिवसांच्या सुट्टीमुळे पाडव्याच्या मुहूर्तावर पर्यटक हजर झाले आहेत. रायगडात येणासाठी फेरीबोट आणि रोरो सेवा असल्याने पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येऊ लागला आहे. अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये पर्यटकची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

अलिबाग, नागावमध्ये आलेला पर्यटक रेवदंडा बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली, पण सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारी करिता समुद्रामध्ये जायला लागल्या आहेत. आता येणाऱ्या मासळीमध्ये जेलीफिशचे प्रमाण जास्त असून, खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीच प्रमाण खूप कमीच आहे. परंतु रोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत आहेत. त्याच मासळीच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत, अशी माहिती येथील नाखवा सतेज बळी यांनी दिली.

पर्यटक खास फिरणं आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. अलिबाग तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक रेवदंडा बंदरामधील ताजी मासळी खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक अलिबाग, नागाव, रेवदंडा येथे येत आहेत. पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळीला पर्यटकांची मागणी जास्त आहे.

इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. मोठी सुरमई किंवा पापलेट असेल तर ते हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह आवरतच नाही. पाडव्यापासून बंदरात पर्यटकांचीच मासळी खरेदीसाठी तुफान गर्दी दिसत आहे. या गर्दीमुळे बंदरामध्ये एक प्रकारची जत्रा असल्यासारखं वातावरण निर्माण झाले आहे.

आम्हाला याठिकाणी खूप ताजी मासळी खायला मिळाली. तसेच येथे पापलेट, सुरमई, कोळंबी याप्रकारचे मासे योग्य दरात मिळाले. मासळी खायची आणि खरेदी करण्यासाठी रेवदंडा बंदरातच यावं, असेच मला पर्यटकांना सांगायचे आहे.

संचिता राऊत, पर्यटक नागपूर
Exit mobile version