पहिलीपासून सर्व वर्ग सुरू होणार
कृती दलाच्या चर्चेअंती निर्णय जाहीर
। मुंबई । वृत्तसंस्था ।
लवकरच शाळेय घंटा आगामी काळात लवकरच निनादण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागांसह शहरांतील पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आदर्श शाळा योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यात राज्यातील पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. कोरोना रुग्णआलेख घसरू लागल्याने सर्व शाळा सुरू करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढू लागला आहे.
ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागांत तर शिक्षक, शाळाचालक, पालक अशी सर्वच मंडळी त्यासाठी आग्रही आहेत.
सध्या काही शाळा दिवाळी सुट्टीमुळे बंद आहेत. मात्र, 20 नोव्हेंबरनंतर त्या पुन्हा सुरू होतील. तोपर्यंत इतरही वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची गरज या बैठकीत मांडण्यात आली. पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचे मत आरोग्य विभागाने मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र, पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याबाबत करोना कृती गट आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच निर्णय होईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्री मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात दाखल आहेत. येत्या काही दिवसांत त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.